पश्चिम राजस्थानमधून येत्या 15 सप्टेंबरपासून हळूहळू मान्सूनच्या माघारीला सुरुवात होणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे. गेल्या 10 वर्षांतील यंदा सर्वात लवकर मान्सून माघारीचा अंदाज आहे. मात्र, देशाच्या अनेक भागात अजूनही नियमित मान्सूनचा पाऊस सुरू आहे. आयएमडीसह, स्कायमेट आणि ॲक्युवेदर या खासगी हवामान संस्थांनी आजपासून पुढील तीन दिवस राज्याच्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, मान्सून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातून माघारी जाण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशभरातील यंदाचा मान्सून पावसाळी हंगाम 15 ऑक्टोबरपर्यंत संपण्याचा अंदाज आहे.
सध्या मान्सून ट्रफ हा उत्तर भारताच्या हिमालयीन भाग आणि मध्य भारतात सक्रिय आहे. या ट्रफमुळे मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, झारखंड आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस होत आहे. अरबी समुद्रावर एक कमी दबावाचा पट्टा असून बंगालच्या उपसागरावरही एक कमी दाब क्षेत्र अस्तित्त्वात आहे, ज्यामुळे देशात पाऊस चांगल्या प्रमाणात आणि सतत सुरू आहे. याशिवाय, पश्चिम-उत्तर भारतात एक चक्रीवात कार्यरत आहे, ज्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. कमी दाबाचे क्षेत्र विदर्भातलगत सक्रिय असल्याने राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे.

महाराष्ट्रात सध्या नियमित मान्सूनचा पाऊस
पश्चिम राजस्थानमधून मान्सूनच्या माघारीचे पहिले संकेत दिसू लागले आहेत. या माघारीची सुरुवात टिकाऊ नसेल. कारण, अजूनही दक्षिण व पूर्व भारतात मान्सून मजबूत आहे आणि पाऊस सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्यातरी नियमित मान्सून पाऊस सुरू आहे. राज्यातील परतीचा पाऊस अजून सुरू झालेला नाही. येत्या काही दिवसांत उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सध्या पूर्वोत्तर भारत, बंगाल, ओडिशा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, मराठवाडा-विदर्भातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रच्या घाट परिसर आणि कोकणातील काही भागांमध्ये पावसाचा सिलसिला सुरूच आहे. पुढील दोन आठवड्यांत मध्य आणि पूर्व भारतात पावसाची अधिक तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
ढगाळ हवामान, वातावरणात गारठा
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, गुजरातमध्ये 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस राहील. काही ठिकाणी मात्र जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागातही 15-17 सप्टेंबरदरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्याजवळ वाऱ्याची गती 30-40 किमी/तासापर्यंत वाढू शकते. हळूहळू देशभरात सर्वत्र, विशेषतः दक्षिण आणि मध्य भारतात पावसाची तीव्रता कमी होत जाऊन स्थिर होण्याचा कल दिसतो आहे. आगामी काही काळ हवामान ढगाळ राहील व वातावरणात थोडा गारठा जाणवेल.

आगामी तीन दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज
– 15 सप्टेंबरपासून मुंबईसह कोकणात पाऊस पुन्हा सक्रिय होईल.
– पुढील 3 दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रात सतत पावसाचे.
– हवामान ढगाळ राहील, थंडगार वारे वाहतील व गारवा वाढेल.
– तापमानात घट, रात्रीचे सरासरी तापमान 23-25°C दरम्यान राहण्याची शक्यता.
– मुंबई, पुणे आणि नागपूरसह महाराष्ट्रातील विविध भागात 15-17 सप्टेंबरदरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस.
– 15 सप्टेंबरला मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, आणि सातारा, पुणे घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस.
– 16 सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा. संध्याकाळी हवामान ढगाळ, विजा व वाऱ्याचा वेग वाढेल.
– 17 सप्टेंबरलादेखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज, काही ठिकाणी विजांचा कडकडाट.
– पुढील काळात मोठ्या प्रमाणावर घट होण्याचा अंदाज आहे.