पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे सेला बोगद्याचे लोकार्पण केले. विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमांतर्गत सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणाऱ्या रस्त्यावर 13,000 फूट उंचीवर बांधला आहे. एकूण 825 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा बोगदा बलीपारा-चरिदुआर-तवांग रोडवरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. त्यामुळे सशस्त्र दलांची सज्जता वाढेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल. या बोगद्यामुळे चीनची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जाते.
उद्घाटन समारंभाला अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते.
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, सेला बोगदा सर्व ऋतूंमध्ये कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि तवांगच्या लोकांसाठी प्रवास सुखकर करेल. ईशान्य प्रदेशात अनेक बोगद्यांचे काम सुरू आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर देशाच्या गरजेनुसार काम करण्याची आपली शैली आहे. आपल्या पुढील कार्यकाळात अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असलेल्या या ठिकाणी भेटायला येऊ.
सेला बोगदा नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती वापरून बांधण्यात आला आहे आणि त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करणार नाही तर देशासाठी सामरिकदृष्ट्यादेखील महत्त्वाचा आहे. या बोगद्याची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते 9 फेब्रुवारी 2019 रोजी करण्यात आली आणि 1 एप्रिल 2019 रोजी बांधकामाला सुरुवात झाली. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या पाच वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. सीमावर्ती भागाच्या विकासात बीआरओ नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गेल्या तीन वर्षांत, बीआरओ ने 8,737 कोटी रुपये खर्चून विक्रमी 330 पायाभूत सुविधा प्रकल्प बांधून पूर्ण केले आहेत.