राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्ली येथे यकृत आणि पित्त विज्ञान संस्थेच्या (आयएलबीएस) नवव्या दीक्षांत समारंभात नुकत्याच सहभागी झाल्या. त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधितही केले.

आयएलबीएस ने केवळ 13 वर्षांच्या कालावधीत जागतिक दर्जाची कार्यक्षमता आणि सचोटीच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आय. एल. बी. एस.मध्ये 1000हून अधिक यकृत प्रत्यारोपण आणि अंदाजे 300 मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. तुलनेने कमी खर्चात जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवून आय. एल. बी. एस. सारख्या संस्थांच्या बळावर भारत आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जीवन विज्ञान आणि आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत. आयएलबीएसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यास विभागाची स्थापना हा एक समयोचित उपक्रम आहे. आय. एल. बी. एस.ने उपचार करण्याबरोबरच संशोधन क्षेत्रात काम करत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. यकृत हे आपल्या शरीराचे सुरक्षारक्षक आहे. आपल्या देशात यकृताशी संबंधित आरोग्याच्या समस्या गंभीर आहेत आणि त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे रोग हे चिंतेचे कारण आहेत. यकृताचे आजार रोखण्यासाठी आय. एल. बी. एस. महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या.

पुरेशा संख्येने अवयव उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्ण यकृत, मूत्रपिंड किंवा इतर प्रत्यारोपणापासून वंचित राहतात. दुर्दैवाने, अवयवदानाशी संबंधित अनैतिक व्यवहार देखील वेळोवेळी प्रकाशात येतात. या समस्यांचे निराकरण करणे ही जागरूक समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशात अवयवदानाबद्दल लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिकाधिक जनजागृती मोहिमा आयोजित करण्याची गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.
डॉक्टरांनी स्वतःची काळजी घ्यावी. कामाच्या लांबणाऱ्या वेळा, सततचे आपत्कालीन उपचार आणि रात्रीची कामे यासारख्या आव्हानांमध्ये, डॉक्टरांना सतत पूर्ण सतर्कतेने आणि उत्साहाने रुग्णांची सेवा करावी लागते. त्यामुळे, सर्व आव्हाने असूनही, त्या सर्वांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या निरोगी आणि सतर्क राहणे महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.