Homeपब्लिक फिगरसत्ता अंतिम कोणाचीच...

सत्ता अंतिम कोणाचीच नसते, प्रत्येकाचा दिवस येत असतो!

आज देशात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला एकेकाळी संपूर्ण बहुमताने सत्तेत यायला २०१४पर्यंत प्रतीक्षा करावी लागली होती. आज जरी ते सत्तेत असले, काही काळ राहिले तरी एक ना एक दिवस सत्ता जात असते. प्रत्येकाचा दिवस येत असतो. त्यामुळे आज सत्तेत असलेल्यांनी सत्तेचा दुरुपयोग करू नये, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षाच्यावतीने काल अंतिम आठवडा प्रस्तावाच्या निमित्ताने धनंजय मुंडे विधानसभेत बोलत होते. राज्यात सातत्याने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून महापुरुषांची होत असलेली बदनामी, याविषयी बोलताना धनंजय मुंडे आज पुन्हा एकदा पूर्वीच्या फॉर्मात दिसून आले.
राज्याच्या सार्वभौम सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, यासह मान्यवर महापुरुषांच्या, राष्ट्रनिर्मितीत योगदान असलेल्या नेत्यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. याची आठवण करून देत महापुरुषांच्या बाबतीत सातत्याने बेजबाबदार व बेताल वक्तव्य करणाऱ्या सत्ता पक्षातील नेत्यांचा मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून सातत्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांना टार्गेट करून बदनाम करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्यांना अडकवण्याचा ते अगदी त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा सातत्याने प्रयत्न होत असून, यापूर्वीचे राजकारण असे नव्हते. केवळ विरोधक आहे म्हणून एखाद्याला संपवायचा, उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करणे नैतिकतेच्या बाहेरचे आहे, असे ते म्हणाले.

यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘भ्रष्ट नितीने एखादा पक्ष संपवून जर सत्ता येत असेल तर अशा सत्तेला मी स्पर्शसुद्धा करणार नाही’, या प्रसिद्ध ओळी हिंदीतून ऐकवल्या. विरोधी पक्षातील नेत्यांना संपवायचे राजकारण एकीकडे करत असताना दुसरीकडे सातत्याने महापुरुषांबद्दल होत असलेली वक्तव्ये थांबवावीत. अन्यथा अशी वक्तव्ये महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असेही मुंडे यांनी सुनावले.

एखादा सर्वसामान्य माणूस किंवा विरोधी पक्षातला नेता जर पंतप्रधानांबद्दल काही बोलला, तर त्याला थेट जेलमध्ये घातले जाते. मग सत्ता पक्षातील लोक जेव्हा युगपुरुषांबद्दल, महापुरुषांबद्दल चुकीची वक्तव्ये करतात, तेव्हा तुम्हाला राग येत नाही का? अशा लोकांनाही सरकारने यापुढे जेलमध्ये घालावे, असेही ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगतात की आम्ही जनतेच्या मनात असलेले सरकार स्थापन केले आहे. हे सरकार जनतेच्या मनातले आहे तर सत्ता पक्षातील आमदार व मंत्री स्वतःभोवती इतकी सुरक्षा घेऊन का फिरतात? जनतेच्या मनात आहात तर मग कोणाची भीती आहे, असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content