Homeटॉप स्टोरीदर तासाला एक...

दर तासाला एक शेतकरी करतो भारतात आत्महत्त्या!

भारतात दर तासाला एक शेतकरी आत्महत्त्या करत असल्याचे वास्तव केंद्र सरकारच्या अहवालातूनच  समोर आले आहे. आत्महत्त्या करणाऱ्यांपैकी सर्वाधिक 38.5% शेतकरी महाराष्ट्रातील असून, त्यानंतर कर्नाटक (22.5%), आंध्र प्रदेश (8.6%), मध्य प्रदेश (7.2%) आणि तामिळनाडू (5.9%) या राज्यांचा क्रमांक लागतो. एकेकाळी समृद्ध कृषी वारशावर भरभराटीला आलेले, परंतु आता नैराश्य आणि यातनांनी व्यापलेले हे प्रदेश आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) ताज्या अहवालात असे दिसून आले आहे की, 2023मध्ये, शेती क्षेत्रात काम करणारा किमान एक व्यक्ती दर तासाला आत्महत्त्या करून मृत्यूला कवटाळतो. त्यामुळे शेती करणाऱ्या कुटुंबावर असलेल्या वाढत्या आर्थिक ताणावर अधिक प्रकाश पडतो.

आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी, उर्वरित शेतमजूर

2023मध्ये, शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 10,786 व्यक्तींचा मृत्यू झाला, जो देशातील एकूण 1,71,418 आत्महत्त्याग्रस्तांपैकी 6.3% होता. तथापि, मागील वर्षाच्या, 2022च्या तुलनेत आत्महत्त्यांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. परंतु तीव्रता आणि कारणे तीच राहिली आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, एकूण आत्महत्त्यांपैकी 43% शेतकरी आहेत, तर उर्वरित शेतमजूर आहेत. एकूण 4,690 शेतकरी आणि 6,096 शेतमजूरांनी आत्महत्त्या केल्या. आत्महत्त्या केलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 4,553 पुरुष आणि 137 महिला होत्या.

पश्चिम बंगाल, ईशान्येसह काही राज्यं आत्महत्त्यामुक्त

दुसरीकडे, काही प्रमुख राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये आत्महत्त्येचे प्रमाण शून्य झाल्याचे अहवालातून दिसत आहे. पश्चिम बंगाल, बिहार, ओदिशा, झारखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, चंदीगड, दिल्ली आणि लक्षद्वीप राज्यांनी ही किमया साधली आहे. 2022मध्ये, उत्तराखंडमध्ये आत्महत्त्यांची संख्या शून्य होती, परंतु 2023मध्ये, तिथे आत्महत्यांच्या संख्येत वाढ झाली. तथापि, यावर्षी झारखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये एकही आत्महत्त्या नोंदवली गेली नाही, तर गेल्या वर्षी, त्यात वाढ झाली होती.

देशातील एकूण आत्महत्त्यांमध्ये वाढ

2022मध्ये, शेती क्षेत्रातील आत्महत्त्यांची संख्या तुलनेने जास्त होती. त्यावर्षी शेतीशी संबंधित एकूण 11,290 व्यक्तींनी आत्महत्त्या केल्या. त्यात 5,207 शेतकरी आणि 6,063 शेतमजूर होते. एकूण 5,207 शेतकरी आत्महत्त्यांपैकी एकूण 4,999 पुरुष आणि 208 महिला होत्या. त्याचप्रमाणे, 2022मध्ये शेती कामगारांनी केलेल्या 6,083 आत्महत्त्यांपैकी 5,472 पुरुष आणि 611 महिला होत्या. दरम्यान, एनसीआरबीने 2023मध्ये देशात एकूण 1,71,418 आत्महत्त्या झाल्याची नोंद केली आहे, जी 2022च्या तुलनेत 0.3% वाढ दर्शवते.

नैराश्याच्या स्थितीत “इथे” तत्काळ संपर्क करा

कुणाच्याही मनात आत्महत्त्येचे विचार येत असतील, किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा भावनिक आधाराची आवश्यकता असेल, तर MANAS सल्लागारांना फोन करा. क्रमांक: 14416 किंवा 18008914416 (टोल फ्री). येथे तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 24 तास समुपदेशक उपलब्ध आहेत.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content