Homeमुंबई स्पेशल१ जूनपासून परळ...

१ जूनपासून परळ टीटी उड्डाणपुलावर दुचाकींना प्रवेशबंदी

मुंबई पूर्व उपनगर ते शहर यामधील महत्त्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या परळ टी टी उड्डाणपुलाच्या डागडुजीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे (एक्स्पांशन जॉइंट) भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या १ जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे.

परळ टीटी उड्डाणपुलावर पावसाळ्याच्या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. याठिकाणी अवजड वाहनांमुळे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणत खड्डे पडतात. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलावर अवजड वाहनांसाठी बंदी घालण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी विनंती पालिकेच्या पूल विभागाला केली होती. अवजड वाहनांना मज्जाव करण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळाले आहे. त्यामुळेच परळ टीटी उड्डाणपुलाच्या आधी आठवड्याभराच्या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश बंदी करणारा हाईट बॅरियर लावण्यात येणार आहे. याठिकाणी २.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. फक्त हलक्या वाहनांना या उड्डाणपुलावरून प्रवेश असेल. सद्यस्थितीत पुलाच्या प्रसरण सांध्याचा भाग वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे पुलाचे सक्षमीकरण होत नाही, तोवर दुचाकींसाठी हा उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित नाही. या उड्डाणपुलासाठी हाईट बॅरिकेट लावण्यासाठी विभागीय पातळीवर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे पूल विभागाकडून सांगण्यात आले.

नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पावसाळी कामांमध्ये उड्डाणपूलांच्या देखभालीच्या कामांना सुरूवात झाली आहे. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये तसेच उड्डाणपुलाचा पर्याय किमान खर्च आणि वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून ऑक्टोबरमध्ये ब्रीजच्या सक्षमीकरणासाठीचे काम सुरू होणार आहे. ३१ मेपर्यंत उड्डाणपुलाची सर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण होतील असा विश्वास पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौंडण्यपुरे यांनी सांगितले. वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरूस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे भरणे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास पूल विभागाने व्यक्त केला आहे.

पालिकेच्या डिलाईल रोड (लोअर परळ) उड्डाणपुलाचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे लोअर परळच्या उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर परळ टीटी उड्डाणपुलाचे काम येत्या ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार आहे. याठिकाणी पुलाच्या सक्षमीकरणाच्या कामासाठीचे कार्यादेश पूल विभागाकडून देण्यात आले आहेत. याठिकाणी एक सॉलिड रॅम्प टाकून सध्याच्या उड्डाणपुलावर नव्या मार्गिकांचा पर्याय वाहनचालकांना मिळेल. पुलाच्या सक्षमीकरणासाठी खालच्या बाजूच्या पोकळीच्या जागा भराव टाकून भरण्यात येणार आहेत. साधारणपणे सहा महिन्यांचा कालावधी या कामासाठी अपेक्षित आहे. १८ कोटी रूपयांचा अंदाजित खर्च या उड्डाणपुलाच्या कामासाठी येणार आहे. विद्यमान उड्डाणपुलाच्या पायाचा आधार घेऊनच नव्या उड्डाणपुलाचा सॉलिड रॅम्प स्थिर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवा उड्डाणपूल बांधण्याचा खर्च आणि वेळ वाचविणे पालिकेच्या रस्ते विभागाला शक्य होणार आहे. सक्षमीकरणाच्या प्रकल्पानंतरच अवजड वाहनांना या उड्डाणपुलावरून पुन्हा प्रवेश देण्यात येईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content