Homeपब्लिक फिगरकाळा पैसा बाहेर...

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मुदत देण्याची गरज नव्हती

खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणार्‍या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे या नोटा नसतात. गेली दोन वर्षेतर बँकेतदेखील या नोटा मिळत नव्हत्या. मग दोन हजाराच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे, तो बाहेर पडण्याकरता सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

१९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत व नंतरही या नोटा चालतील असे सांगण्यात आले. पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले त्याच्या दुसर्‍या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपद्धतीने यावेळीही करता आले असते आणि त्यातून काळा पैसा चलनामध्ये फिरण्यापासून वाचवता आला असता, असेही ते म्हणाले.

आमचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकार्‍याच्या करारनाम्यावर स्पष्टपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी नवाब मलिक यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला. त्याच आरोपांची चौकशी आज सीबीआय करत आहे. ते अधिकारी फार स्वच्छ आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता मात्र लोकांसमोर सीबीआयनेच सत्य समोर आणले आहे, असेही पवार म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मीसुद्धा त्यावेळी उपस्थित राहणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्रीय व राज्याच्या यंत्रणांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. मुंबईत अधिवेशन सुरू असताना पुरवण्या मागण्यांच्यावेळी सत्ताधारी आमदारांनी काय सांगितले हे रेकॉर्डवर आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे मंत्रीपदे उपभोगल्यानंतर भाजपमध्ये गेल्यावर पुण्यात एका माजी मंत्र्यांनी आम्हाला आता शांत झोप लागते, असे सांगितले. तीच गोष्ट एका खासदाराने सांगलीत सांगितली तर एका केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आमच्याकडे निरमा वॉशिंग मशीन आहे, असे वक्तव्य केले होते. द्वेषभावनेतून, राजकीय सूडबुध्दीने कुणाला अशा तपासयंत्रणांकडून बोलावले जाऊ नये असेही त्यांनी सांगितले.

जेव्हाकेव्हा आमच्या नेत्यांना तपासयंत्रणांनी चौकशीसाठी बोलावले तेव्हातेव्हा आपण कोणालाही माहिती घेण्यासाठी फोन केला नाही. छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक… कधीच कुणाला फोन केला नाही. जयंत पाटील यांनाही नाही. फोन कशासाठी करायचा, प्रत्यक्ष भेटीतच माहिती घेईन, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी कायम एकजुटीने राहणार आहे. मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो. एक पक्ष असला तरी वेगवेगळ्या चर्चा होत असतात. आता जागावाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो या तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आणि त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करतील, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content