Homeहेल्थ इज वेल्थचौथ्या टप्प्यातल्या कर्करोगाशी...

चौथ्या टप्प्यातल्या कर्करोगाशी लढणाऱ्या अभियंत्याला नवजीवन!

नागपूरचा २६ वर्षीय अभियंता तीर्थनकार निरंजन रॉय एका अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याला रक्ताचा कर्करोग (हॉजकिन्स लिम्फोमा), तोही चौथ्या टप्प्यात, झाल्याचे निदान झाले होते. शरीर दिवसेंदिवस अशक्त होत चालले होते. वजन तब्बल २० किलोने घटले होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार मिळण्यास विलंब होत होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही योग्यवेळी उपचार मिळत नव्हते. अशा परिस्थितीत संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी तातडीने उपचारांची व्यवस्था केली. यामुळे या तरुण अभियंत्याचे प्राण वाचले!

वेळेवर उपचार आणि यशस्वी प्रत्यारोपण!

आर्थिक परिस्थिती उत्तम असूनही वेळेत उपचार मिळत नसल्याने मुलाचे होणारे हाल कुटुंबासाठी असह्य झाले होते. शेवटी तीर्थनकारच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. या हाकेला त्वरित प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी नाईक यांना कार्यवाहीचे आदेश दिले. नाईक यांनी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. जिथे उपचारांसाठी एक वर्ष लागले असते, तिथे अवघ्या दोन महिन्यांत ‘ऑटोलॉगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट’ यशस्वी झाले. तीर्थनकारने मृत्यूच्या उंबरठ्यावरून परत येत कर्करोगावर विजय मिळवला!

आज तो अनेकांच्या जगण्याची प्रेरणा!

प्रत्यारोपणानंतरची पहिली लस घेण्यासाठी आज, तीर्थनकार नुकताच नागपूरहून मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये आला. उपचारानंतर रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्याने बालपणातील सर्व लसी पुन्हा घ्याव्या लागतात. ही प्रक्रिया त्याच्यासाठी संघर्षाच्या आठवणींना उजाळा देणारी ठरली. आज तीर्थनकार केवळ स्वतःचे नवजीवन जगत नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्करोगाविषयी जनजागृती करतो. निरोगी राहण्याचे सल्ले देतो आणि कर्करोगाशी लढणाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनतो.

मानवी संवेदनशीलतेचे उदाहरण!

तीर्थनकारचा आजाराशी लढा आणि त्यावर मिळवलेला विजय वैयक्तिक नाही, तर संवेदनशील लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि तत्पर कक्षप्रमुख यांनी माणुसकीच्या भावनेतून दिलेल्या मदतीचे जिवंत उदाहरण आहे. एका वडिलांची हाक आणि मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता यामुळे आज तीर्थनकार नव्या उमेदीने आयुष्य जगतोय! माहिती तंत्रज्ञान (आय. टी.) अभियंता तीर्थनकार रॉय
कक्षप्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी उत्सुक आहे. तो म्हणतो- मी रामेश्वर नाईक यांचे मनापासून आभार मानतो. उपचारांसाठी सामान्यतः एक वर्ष लागणारी प्रक्रिया त्यांच्या प्रयत्नांमुळे लवकर पार पडली. त्यामुळे मी चौथ्या टप्प्यात निदान झालेल्या कर्करोगावर विजय मिळवू शकलो. आज, प्रत्यारोपणानंतर एका वर्षाने, मी लस घेतली आणि नवीन जीवन जगतोय. हे सर्व नाईक यांच्यामुळे शक्य झाले.

Continue reading

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...

झाडाला पिकलाय आंबा.. गाण्याची दुबईत क्रेझ!

दुबईस्थित मराठमोळा संगीतकार आणि सांस्कृतिक उद्योजक सागर पाटील यांनी त्यांचे नवीन गाणे “झाडाला पिकलाय आंबा – द मॅंगो अँथम” नुकतेच दुबईत प्रदर्शित केले आहे. भारतीय संस्कृती आणि संगीताचा उत्साहपूर्ण संगम असलेले हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून...

देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम सिंधुदुर्गात साकार

सिंधुदुर्गात देशातले पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)मार्फत सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर नुकतीच यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. देशातल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटनप्रकल्पाचा हा एक भाग...
Skip to content