Homeटॉप स्टोरीशरद पवारांबरोबरच्या चर्चेला...

शरद पवारांबरोबरच्या चर्चेला नाना पटोलेंची दांडी!

राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या कुरबुरी मिटविण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आजही अपुरे पडले. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु, या बैठकीला दोन्ही पक्षातल्या नव्या वादाला तोंड फोडणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच दांडी मारली. दरम्यान, राज्य सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या पटोले यांच्या आरोपाला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पक्षाच्या टिळक भवन येथील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाच्या विविध नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावरही बरीच चर्चा झाल्याचे कळते. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या एका पक्ष कार्यकर्त्यांच्या शिबिरात पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता. त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीतला पेच वाढला होता.

पटोले यांच्या आरोपाबद्दल शरद पवार यांना विचारले असता त्यांनी लहान माणसांच्या वक्तव्यावर आपण भाष्य करत नाही, असे सांगत पटोले यांना उडवून लावले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यावर भाष्य करताना प्रत्येक सरकार आपल्याला असलेले धोके जाणून घेण्यासाठी यंत्रणा निर्माण करते, असे सांगत पटोले यांच्या आरोपाला अप्रत्यक्ष दुजोराच दिला होता.

आज पाटील यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी पटोले यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे नमूद केले. पटोले यांना केंद्र सरकार आपल्यावर पालत ठेवत असल्याचे सांगायचे होते. परंतु त्यांनी केंद्र असा शब्द वापरला नसल्याने सर्वांनी असा अर्थ काढला, असे पाटील म्हणाले.

आज संध्याकाळी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंळाने शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मंत्रीही यात सहभागी होते. मात्र, पटोले त्यांच्याबरोबर गेले नाहीत. या नेत्यांनी जवळजवळ पाऊण तास पवार यांच्याबरोबर चर्चा केली.

चर्चेनंतर थोरात यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी भाष्य केले. सध्याची राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, केंद्र सरकारने स्थापन केलेले सहकार मंत्रालय, अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. महाविकास आघाडीत कोणत्याही कुरबुरी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content