Homeपब्लिक फिगरमुंबईत बुधवारपासून ‘मराठी...

मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’!

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन येत्या बुधवारपासून मुंबईत आयोजित केले जात असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे ४ ते ६ जानेवारी २०२३ या कालावधीत ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, राज्यातील १६४ नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तसेच, राजघराण्यातील मान्यवर, परकीय वकीलातीतील राजदूत इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे हादेखील हेतू असल्यामुळे, परेदशातील निमंत्रित उद्योजकांसमवेत संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ६ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

लुप्त होत चाललेली वाद्यसंस्कृती, खाद्यसंस्कृती, वस्त्रसंस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हासुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरीक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरीक मनोरंजन, ग्रंथप्रदर्शन, बचतगटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे.

संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी जनांची अभिरुची लक्षात घेऊन संमेलनाच्या ४, ५ व ६ जानेवारी २०२३ या दिवशी संध्याकाळी ६ नंतर अनुक्रमे चला हसू या, सांस्कृतिक संचालनालयाचा महासंस्कृती लोकोत्सव आणि मराठी बाणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक संचालनालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध सांस्कृतिक पैलू सादर केले जातील. यातील ‘महाताल’ वाद्यमहोत्सवात १५ वेगवेगळ्या दुर्मिळ वाद्यांचे सादरीकरण ५० कलाकारांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण व सर्व वाद्यांच्या तालावर महाराष्ट्र गीताचे सादरीकरण होईल. ‘वाद्य जुगलबंदी’मध्ये ढोलकीची जुगलबंदी, संबळ व हलगी या वाद्यांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. ‘महासंस्कृती लोकोत्सव’मध्ये महाराष्ट्रातील भक्तीसंस्कृती, जागर, आदिवासीसंस्कृती, बंजारानृत्य तसेच शिवकालीन लोककला, कोळीगीते, बोहाडा व सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ ते १० या वेळेतील कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहेत, असेही दीपक केसरकर यांनी सांगितले.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content