Homeकल्चर +विनय आपटे, लालन...

विनय आपटे, लालन सारंग व डॉ. गिरीश ओक यांना ऐका स्टोरीटेलवर!

लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘पाणी पाणी’ हा बहुचर्चित कथासंग्रह आता (३ ऑगस्ट २०२१) स्टोरीटेलवर विनय आपटे, लालन सारंग आणि डॉ. गिरीश ओक या दिग्गज कलाकारांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. स्टोरीटेल मराठीच्या ऑडिओबुकमध्ये!

दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांच्या भारदस्त आवाजातली कलाकृती ऐकण्याची संधी यानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी रंगमंचावर अनेक नाटकं गाजवली. आजच्या मिलेनियल पिढीला त्यांचा अभिनय प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्याचं भाग्य लाभलं नसलं तरी या ऑडियोबुकच्या माध्यमातून नव्या जुन्या पिढीच्या रसिकांना पुन्हा एकदा त्यांच्या आवाजाची जादू अनुभवता येईल.

‘पाणी पाणी’ या लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथासंग्रहातल्या १४ कथा पाण्याचं दुर्भिक्ष्य, त्यातलं राजकारण, समाजकारण, समन्यायी पाणी वाटपाचं बासनात गुंडाळून ठेवलेलं धोरण, पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा स्त्रियांच्या आयुष्यावर होणारा परिणाम, पाणीचोरी, भ्रष्टाचार यासारख्या अनेक मुद्द्यांवर बेतलेल्या असून या कथा अतिशय हृदयस्पर्शी आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष असलेल्या देशमुखांच्या कथांची धाटणी वेगळी आहे, श्रोत्यांना खिळवून टाकण्याऱ्या या कथा आहेत.

आज एकीकडे महापुरांनी शहरं वेढली जात असताना दुसऱ्या बाजूला आटपाडी, कवठे महांकाळसारखी पश्चिम महाराष्ट्रातली गावं, मराठवाड्यातली, विदर्भातली शेकडो खेडी पिण्याच्या पाण्यासाठीही तहानलेली आहेत. जागतिक तापमानवाढीचं मोठं संकट संपूर्ण जगासमोर आ वासून उभं राहिलेलं असताना एकीकडे पूर आणि दुसरीकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य असं विरोधाभासी चित्र दिसत आहे. या चित्राच्या सामान्य माणसाला न कळलेल्याही अनेक बाजू आहेत. हे अनेकविध पैलू देशमुख यांच्या कथांमधून समजतात.

लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासारख्या समर्थ लेखकानं कथात्म साहित्याला आपल्या कारकिर्दीतील प्रशासकीय अनुभवाची, ज्ञानाची जोड दिल्यानं या कथा निव्वळ प्रश्नांच्या चर्चेपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यापलीकडे जात पाणीप्रश्नाची समज व्यापक करण्यासाठी मदत करतात  पर्यावरण, पाणीप्रश्न हा अखिल मानवजातीसमोर उभा असलेला मोठा प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांपासून, समाजशास्त्राचे अभ्यासक, पर्यावरण कार्यकर्ते, राजकारणी, धोरणकर्ते, सामान्य नागरिक ते कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांपर्यंत प्रत्येकानंच ऐकाव्यात अशा या कथा आहेत. उत्तम साहित्यमूल्य आणि समाजशास्त्रीय संदर्भमूल्य असलेल्या या ‘तहानलेल्या महाराष्ट्राच्या कथा’ आता एकत्रितपणे दिग्गज कलाकारांच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येतील.

Continue reading

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...
Skip to content