Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्राला कमी लस...

महाराष्ट्राला कमी लस मिळाल्याचा बाऊ केल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली

लसीकरणासाठी जय्यत तयारीचा दावा करत आम्हाला लसीचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नाही म्हणून केंद्र सरकारवर दुगाण्या झाडणाऱ्या राज्यातल्या आघाडी सरकारने आतापर्यंत फक्त नऊ लाख लोकांनाच लस देण्यात यश मिळविल्याचे आज अखेर स्पष्ट झाले. समाजमाध्यमाद्वारे जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच ही कबुली दिली.

या लसीमुळे आपल्याला काही साईडइफेक्ट होतील या भीतीने लसीकरण कमी झाल्याची कबुली देताना ही भीती दूर करण्यात सरकार कमी पडले हेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. त्याचबरोबर कोणतीही भीती न बाळगता बेधडकपणे लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडून आम्हाला कमी लसपुरवठा केला जात असल्याचे सांगत ५० लाख लोकांना लस देण्याची तयारी आम्ही केल्याचे म्हटले होते.

अभावानेच प्रत्यक्ष स्थळावर जात कार्यक्रमांना हजर राहणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यानंतर आपण सर्व शासकीय कार्यक्रम दूरदृष्य प्रणालीमार्फत करणार असल्याचे जाहीर केले. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच यात्रांवर काही काळासाठी बंदी घालण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. जनतेला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे तसेच वारंवार हात धुण्याचे आवाहन करून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याबाबतचा निर्णय आपण एका आठवड्यानंतर घेऊ, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

आपल्या संबोधनात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांच्यावर तसेच केंद्र सरकारवर वाढत्या कोरोनाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला. अलीकडे काही जण कोरोना योद्ध्यांचा सत्कार करत फिरत आहेत. कोरोना योद्ध्यांचा सत्कार व्हायलाच हवा. पण यानिमित्ताने तुम्ही कोरोना दूत होऊ नका. कोरोना पसरवण्यासाठी कारणीभूत ठरणारे हे सुरू करा, ते उघडा असे सांगू नका, असे ते म्हणाले.

काही जण आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यास सांगत आहेत. चाचण्या जरूर वाढवू, पण नियमांचे पालन करण्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी केला. माझे कुटूंब, माझी जबाबदारी, या मोहिमेप्रमाणे आता मी जबाबदार, अशी मोहीम आपण सुरू करूया, असे ठाकरे म्हणाले.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content