Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला...

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला घरघर?

पाच वर्षांच्या कारभाराचे आश्वासन देणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीला अवघ्या दीड वर्षात घरघर लागण्यास सुरूवात झाली आहे. सत्तेतला तिसरा पक्ष म्हणून कायम हिणवला जात असलेल्या काँग्रेसने राहुल गांधींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वबळाचा नारा दिला तर त्यापाठोपाठ आज केंद्र सरकारच्या विविध तपासयंत्रणांच्या कारवाईमुळे बेजार झालेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे.

ज्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपला २२वा वर्धापनदिन साजरा करत होते, पक्षाध्यक्ष शरद पवार, शिवसेना कसा निष्ठावान पक्ष आहे, याचे तोंड भरून कौतुक करत होते, नेमके त्याचदिवशी म्हणजे १० जूनला प्रताप सरनाईक यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे समजते.

या पत्रामध्ये सरनाईक यांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सध्याच्या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे, त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील, तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल, अशी विनंती सरनाईक यांनी या पत्रात केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रार

सरनाईक यांनी या पत्रात केंद्रीय तपास यंत्रणांबद्दल तक्रारही केली आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दलाल व शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरू आहे, त्यालाही यामुळे कुठेतरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करत असताना आमच्या कुटुंबियांवरही सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला, की दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवणे असे प्रकार होत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे सारे थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

नेत्यांचे वैयक्तिक संबंध चांगले

प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये युती तुटल्यानंतरही शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांचे संबंध चांगले असल्याचे नमूद केले आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात आपली युती तुटल्यानंतरही नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. तो तुटण्याआधी जुळवून घेतले तर बरे होईल. त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल, असेही ते या पत्रात म्हणातात.

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आघाडी?

काँग्रेस राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी आपण आघाडी केली का? असा सवालही त्यांनी पक्षप्रमुखांना विचारला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे त्या पक्षांच्या लोकांना वाटत आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतले काही मंत्री, नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिशी लागू नये, म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे लगेच होतात, पण आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, अशी तक्रारही प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री व सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी छुपी हातमिळवणी करीत आहेत, हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे, असेही ते या पत्रात म्हणतात.

आमचा तुमच्या नेतृत्त्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन, कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्राचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झाले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीत जे राजकारण सुरू आहे, सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असतील, आपला पक्ष कमकुवत करत असतील तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.

Continue reading

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...

उद्या आनंद घ्या अतुल खांडेकर यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत अतुल खांडेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या, १६ ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी तबल्यावर रामकृष्ण...
Skip to content