Homeटॉप स्टोरीएमपीएससी परीक्षा घोळामागे...

एमपीएससी परीक्षा घोळामागे सरकारचा हलगर्जीपणा?

कोणत्याही परिस्थितीत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, हे राज्य सरकारचे आश्वासन मोडित काढताना सरकारने या परीक्षा घेण्याची पुरेशी तयारीच केली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अप्रत्यक्ष कबूल केले.

येत्या रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा अवघे तीन दिवस असताना पुढे ढकलल्याने राज्यभर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा एकच आक्रोश व उद्रेक झाला. गुरूवारी दिवसभर राज्यभर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शने, ठिय्या आंदोलन केल्यानंतर विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीसह काँग्रेसच्या नेत्यांनीही या परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ नये याचा आग्रह धरला होता. त्यानंतर रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधताना या परीक्षा घेण्यासाठी कर्मचारीवर्गाची सोयच झाली नसल्याचे मान्य केले.

दिवाळीआधी परीक्षा पुढे ढकलताना आपण त्या कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पुढे ढकलल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले. परीक्षा घेताना शासकीय कर्मचाऱ्यांची गरज लागते. विद्यार्थ्यांना बसवण्याची सोय करणे, त्यांना पेपर देणे, पेपर गोळा करणे, त्यांचे गठ्ठे बांधणे या साऱ्या कामांना कर्मचारी लागतात. विद्यार्थ्यांबरोबर वावरणाऱ्या साऱ्या कर्मचाऱ्यांची चाचणी झाली पाहिजे. ते यात निगेटिव्ह आले पाहिजेत. त्यातल्या जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण झालेले असले पाहिजे. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे दडपण असता कामा नये, यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या परीक्षांची नवीन तारीख उद्याच जाहीर केली जाईल आणि ती येत्या आठ दिवसांतच असेल अशा सूचना आपण आयोगाला दिल्या आहेत. वयोमर्यादेची कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही. या गैरसोयीबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो. विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. कोणी भडकवतो म्हणून त्यांची राजकीय बंदूक आपल्या खांद्यावर घेऊ नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना पुन्हा जोर धरत आहे. तो रोखण्यासाठी सर्व शासकीय कर्मचारी गुंतले आहेत. कोणाला बाधा झाली आहे, त्याची चाचणी झाली का, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले का, त्यांच्या संपर्कात कोण आले होते, आदी माहिती घेण्यात सारे व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.

Continue reading

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...
Skip to content