Homeएनसर्कलभारताचा इराणबरोबर सौदा?...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, “भारताच्या सहृदय नागरिकांचे मनःपूर्वक आभार.”

या मदतीमागे केवळ मानवता नाही, तर कूटनीतीचाही धागा जोडलेला आहे. इराणने भारताशी झालेल्या राजनयिक चर्चेत हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना मुक्त मार्ग देण्याच्या बदल्यात दोन अटी मांडल्या होत्या- एक, भारताने जप्त केलेल्या इराणी जहाजांची सुटका करावी; आणि दोन, औषधे व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करावा. या पार्श्वभूमीवर भारताने वैद्यकीय साहित्य पाठवणे, हे केवळ दयाळूपणाचे नव्हे, तर हॉर्मुझ मार्गावरील वाटाघाटींचाही एक भाग असल्याचे स्पष्ट होते. शिवालिक आणि नंदा देवी या जहाजांना हॉर्मुझमधून सुरक्षित मार्ग मिळणे आणि वैद्यकीय मदत रवाना होणे- दोन्ही घडामोडी एकाचवेळी घडल्या हा योगायोग नाही, असे जाणकार सांगतात.

इराण

इराणमधील मानवीय संकट किती तीव्र आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होते. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे इराणमध्ये 32 लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत. अमेरिका-इस्रायल हल्ल्यांनी इराणमधील किमान 13 रुग्णालये आणि इतर आरोग्य केंद्रे उद्ध्वस्त झाली असून काही वैद्यकीय केंद्रांना स्थलांतर करावे लागले. जागतिक आरोग्य संस्था (WHO)चे दुबई हे जागतिक मानवतावादी पुरवठा केंद्र युद्धामुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे 25 देशांच्या 50 आपत्कालीन वैद्यकीय मागण्या रखडलेल्या आहेत आणि 1.8 कोटी डॉलर किमतीचा वैद्यकीय साठा अडकलेला आहे. अशा परिस्थितीत भारताची थेट मदत इराणसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

भारताने वैद्यकीय मदत पाठवणे म्हणजे केवळ एका देशाला मदत नाही. हे भारताच्या “शेजारी प्रथम” आणि “वसुधैव कुटुंबकम” या परराष्ट्र धोरणाचे प्रत्यक्ष दर्शन आहे. एकीकडे भारत इराणकडून तेल खरेदी करतो, हॉर्मुझमधून आपले जहाज सुरक्षित काढतो, आणि त्याचवेळी इराणच्या जखमी नागरिकांसाठी औषधे पाठवतो, हेच भारताचे संतुलित, व्यावहारिक आणि मानवतावादी परराष्ट्र धोरण जगात वेगळे उठून दिसते. अमेरिकेच्या दबावाखाली न येता, पण इस्रायलशीही उघड संघर्ष न करता भारत या युद्धात आपला स्वतंत्र मार्ग आखत आहे, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content