Homeपब्लिक फिगरराष्ट्रपतींचा खरा अपमान...

राष्ट्रपतींचा खरा अपमान काँग्रेसकडूनच!

ज्या राष्ट्रपतींचा उल्लेख यांच्या नेत्यांनी राष्ट्रीय पत्नी, असा करून अपमान केला, ज्या काँग्रेसने राष्ट्रपतींच्या पहिल्या भाषणावर बहिष्कार घातला, आणि आता याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर, एका आदिवासी महिलेवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी काल एका पत्रकार परिषदेत केली.

याच नवीन संसद भवनाचे उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. या निमित्ताने राष्ट्रपतींच्या अपमानाचा राग आळवणाऱ्या काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी मुर्मू यांना बिनविरोध निवडून येण्यासाठी का पुढाकार घेतला नाही, का त्यांच्यासमोर आपला उमेदवार दिला, असा सवाल त्यांनी केला. संसद भवन हे लोकशाहीचे प्रतीक आहे. भारत किती मोठा प्रगतीशील देश आहे हे दाखवण्याची ही संधी आहे. ती नाकारताना पंतप्रधानांना हुकूमशहा म्हणायचे कितपत योग्य आहे? इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशात आणीबाणी लादली गेली. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुरुंगात डांबले गेले. याला म्हणतात हुकूमशाही… आज जर देशात हुकूमशाही असती तर संजय राऊत, त्यांचे मालक, त्यांची मुलं जेलमध्ये असती. पत्रकार मनाला येईल ते लिहू शकले नसते, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जितके बाळासाहेब ठाकरे समजले, त्यांनी जितका त्यांचा आदर केला, तितका आदर तुमच्या मालकांनी तरी केला का? माझा बाप चोरला.. माझा बाप चोरला.. असे म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत आपल्या वडिलांचे स्मारक तरी बांधले का? देशातल्या तमाम हिंदूंचे राजकीय प्रेरणास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्थान फक्त आपल्या बापापुरता मर्यादित करणारे उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. जे उद्धव ठाकरे अडीच वर्षात आपल्या वडिलांचे स्मारक उभारू शकले नाही त्याचठिकाणी पंतप्रधान मोदींनी देशाला अभिमान वाटेल अशी नव्या संसद भवनाची वास्तू उभी केली, असेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःसाठी काय केले? आपल्या कुटुंबासाठी काय केले? एक गोष्ट दाखवा. तुम्ही ज्या सरकारला, ज्या मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य म्हणता, त्याच मुख्यमंत्र्यांकडे एमएमआरडीए खाते आहे आणि त्याच खात्याकडून तुमच्या वडिलांचे स्मारक बांधले जात आहे. तुम्हाला किंचितसा जरी स्वाभिमान असेल तर हे स्मारक मी सरकारच्या नाही तर स्वतःच्या पैशाने बांधीन, असे जाहीर करा, असे आव्हान त्यांनी दिले. या स्मारकाच्या ठिकाणी म्हणजेच जुन्या महापौर निवासात रात्रीच्या वेळी तुमचा मुलगा, भाचा आणि त्यांची नाईट लाईफ गॅंग कुठची गाणी वाजवतात, त्याचे व्हिडिओ दाखवू का? ही पवित्र वास्तू आहे ना… मग इथे घाणेरडे प्रकार होतात कसे, असा सवालही त्यांनी केला. बाळासाहेबांचे हे स्मारकच नाही तर त्यांचे स्मृतिस्थळाचा खर्चही मुंबई महापालिका करते. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथीनिमित्त होणारे कार्यक्रम हेही मुंबई महापालिकेकडूनच आयोजित केले जातात. हे एक पैसा खर्च करत नाही. मग कर्जतच्या फार्म हाऊसवर उभारलेल्या २०००च्या नोटांचा कारखाना काय कामाचा, असे ते म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर हेच उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही नाती जपतो. त्यांचे हे शब्द किती हास्यास्पद आहेत हे त्यांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना आणि त्यांना ओळखणाऱ्या सर्वांना माहीत आहे. नारायण राणे यांना मारण्याची सुपारी यांनीच दिली. राज ठाकरे यांचा वारंवार अपमान यांनीच केला. यांच्या बंधूंनी न्यायालयाचे प्रतिज्ञापत्रे दिली आहेत ती वाचली की यांनी नाती कशी जपली, हे सर्वांना समजून येईल. यांनी नाती फक्त पाटणकर आणि सरदेसाईबरोबरच जपली. याच उद्धवजींनी केजरीवाल यांचा उल्लेख राजकारणातील राखी सावंत असा केला होता. मग ता आम्ही काय म्हणायचे, असा सवालही नितेश राणे यांनी केला.

ज्या कामांचे भूमिपूजन आम्ही करतो, त्यांचे उद्घाटनही आम्हीच करतो. ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. त्यांचे विचार आहेत आणि संस्कार आहेत. कोविडचा काळ जो उद्धवजींना फार आवडतो, त्यावेळी तयार झालेले कोविड यु टी आणि कोविड ए यु, हे व्हायरस आम्ही एकनाथ शिंदे नावाच्या व्हॅक्सिनने कायमचे संपवले आणि संपूर्ण महाराष्ट्र या व्हायरसपासून मुक्त केला, असेही ते म्हणाले.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content