Homeपब्लिक फिगरविद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नियमांची...

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा!

मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवरील शासकीय वसतिगृहात १८ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या झालेल्या घटनेपासून धडा घेत राज्यातल्या सर्व वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची युध्दपातळीवर अंमलबजावणी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

मरीन ड्राईव्हवरील पोलीस जिमखान्याजवळ असलेल्या सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात एका 18 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्त्या करण्यात आली. पीडित तरुणी अकोल्याची असून शहरातील महाविद्यालयात शिकत होती. ती एका कंपनीत अर्धवेळ काम करत होती. ही घटना दि. ६ जून २०२३ रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. कथित गुन्हेगार ओमप्रकाश कनोजिया या ३३ वर्षीय सुरक्षारक्षकाने नंतर मरीन लाईन्स स्टेशन आणि चर्चगेट दरम्यानच्या रेल्वे रुळांवर स्वतःचा जीव दिला. विवाहित आणि कुलाब्यात राहणारा कनोजिया हा या भीषण गुन्ह्यात प्रमुख संशयित होता.

या संदर्भात उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, पोलीस महासंचालक आदींना एक पत्र पाठवून वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांची, कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.

९० दिवसांचा कालावधी गृहित धरुन ही नियमावली तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहर, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करुन सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे. विद्यार्थिनींच्या तक्रारींनंतर त्यांना तत्काळ प्रतिसाद देऊन सहानुभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. अनेकवेळा महिला तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी संवाद समितीसुद्धा गठीत करावी. या समितीमध्ये प्राध्यापक महिला, प्रशासकीय महिला, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी, सायबर संबंधातील प्रतिनिधी अशी सर्वसमावेश समिती असावी. प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अशा सर्व वसतिगृहांना त्या-त्या पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक १५ दिवसांतून एकदा भेट देऊन तेथील प्रवेशितासोबत संवाद साधावा. याबाबतच्या भेटीचा अहवाल राज्यस्तरावर संकलित करण्यात यावा, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे? ह्या घटनेचा छडा लागू नये पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झालाय का, याबाबत पोलिसांनी अधिक तपास करावा तसेच आरोपींवर आवश्यक कलमे लावून त्वरीत पुढील कारवाई करावी व लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे. या घटनेतील आरोपीस मदत करणारे त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कारवाई करावी. पीडितेच्या कुटुंबाचे मानसिक समुपदेशन करण्यात यावे तसेच पिडीत कुटुंबाला मनोधेर्य योजनेतून तत्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content