Homeएनसर्कलराज्यात १२ची परीक्षा...

राज्यात १२ची परीक्षा २३ तर १०वीची २९ एप्रिलपासून!

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिलपासून तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)ची लेखी परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याची घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली.

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षामंडळ संचालक दिनकर पाटील उपस्थित होते.

इयत्ता 12 वीची प्रात्यक्षिक परीक्षा 1 एप्रिल ते  22 एप्रिल दरम्यान होईल तर लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या कालावधीत घेण्यात येईल. या परीक्षेचा निकाल अंदाजे जुलै 2021च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल यादरम्यान होतील तर लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या कालावधीत घेण्यात येतील. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट 2021 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. राज्यात इ. 9वी ते इ.12वीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत असून 18 जानेवारी 2021पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत व 21 हजार 287 शाळा सुरू आहेत. यात एका दिवशी केवळ पन्नास टक्के उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सुमारे 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहितीही प्रा. गायकवाड यांनी यावेळी दिली.

बालविवाह रोखण्यासाठी विशेष मोहीम

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू असल्यामुळे या कालावधीत पालकांकडून मुलींचे शिक्षण थांबवून त्यांची लग्ने लावून देण्याची शक्यता जास्त आहे. अशा स्वरूपाचे बालविवाह रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जादा फी वसुलीविरूद्ध योग्य बाजू मांडू

अनेक शाळांकडून पालकांकडे जादा फी वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्याविरूद्ध राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. याविरूदध मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तेथे योग्य ती बाजू मांडण्यात येईल, असेही प्रा. गायकवाड म्हणाल्या.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content