Homeपब्लिक फिगरपुढच्या काळात फक्त...

पुढच्या काळात फक्त केंद्राच्याच निवडणुका!

येणारे वर्ष निवडणुकांचे असून यावेळी आपण चुकलो तर देशातून लोकशाही गायब होईल. आगामी काळात केवळ केंद्रातील निवडणुका होतील, राज्यातील निवडणुका होणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पार्टीवर केली. केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकुमाच्या विरोधात आम्ही आम आदमी पार्टीबरोबर आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, खासदार राघव चड्ढा, संजय सिंह आदी उपस्थित होते. यानंतर ठाकरे आणि  केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

शिवसेना आणि मातोश्री नाते जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. काही लोक राजकारण करतात, पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाते जपतो. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दोन निर्णय दिले. त्यात एक शिवसेनेबाबत आणि दुसरा दिल्ली सरकारबाबत आहे. लोकशाहीमध्ये सर्वात जास्त महत्त्व लोकप्रतिनिधींना असायला हवे. दिल्ली सरकारबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी आवश्यक होता. परंतु त्याविरोधात केंद्राने वटहुकूम आणला. ही लोकशाही आहे का? जर हे असेच सुरू राहिले तर यापुढे केवळ केंद्राच्या निवडणुका होतील, राज्याच्या निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे जनतेला झोपेतून जागे करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकार सुप्रीम कोर्टालाही जुमानत नाही- अरविंद केजरीवाल

दिल्लीतील लोकांनी आपल्या अधिकारांसाठी आजवर मोठी लढाई लढली. फेब्रुवारी २०१५मध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनले. त्यानंतर तीन महिन्यात मे २०१५मध्ये केंद्राने एक आदेश जारी करत सरकारचे सर्व अधिकार काढून घेतले. अखेर ८ वर्षे लढा दिल्यानंतर कोर्टाने आमच्या बाजूने निर्णय दिला. पण त्यानंतर अवघ्या ८ दिवसांत केंद्राने वटहुकूम जारी करून आमचे अधिकार काढून घेतले. याचा अर्थ केंद्रातील सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयालाही जुमानत नाही हे त्यांनी दाखवून दिले, असे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे आणि केवळ दिल्लीची नाही तर देशातील सर्व राज्यांची, जनतेची लढाई आहे. विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याच्या भाजपाच्या तीन पद्धती आहेत. जेथे भाजपा सरकार नाही तेथे आमदार खरेदी करून सरकार पाडले जाते. जिथे आमदार विकले जात नाहीत तेथे केंद्रीय तपासयंत्रणांची भीती दाखवून आमदार फोडून सरकार पाडले जाते. तिसरी पद्धत दिल्लीप्रमाणे तेथील सरकारचे सर्व अधिकार अध्यादेश आणून काढायचे. केंद्रातील भाजपाचा अहंकार वाढला आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content