Homeकल्चर +महाराष्ट्रातल्या मध्यरात्रीचे मिथक...

महाराष्ट्रातल्या मध्यरात्रीचे मिथक केले ‘गोंधळ’ने जिवंत

गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) काल झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाच्या चमूने प्रेक्षकांना थेट महाराष्ट्रात मध्यरात्री होणाऱ्या प्रतिष्ठित विधीतील ढोल-ताशांचा गजर, फेर धरणारी पात्रे आणि दैवीतल्या भक्तिभावाच्या वातावरणात नेले. दिग्दर्शक संतोष डावखर आणि अभिनेते किशोर कदम यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून सादर होणारी ही प्राचीन लोककला गोंधळ चित्रपटाच्या माध्यमातून वासना, फसवणूक आणि सुटका अशी थरारक कथा या चित्रपटाची कणा कशी बनली, हे सांगितले.

चर्चा सुरू करताना, संतोष यांनी हा चित्रपट थेट गोंधळ लोककथेवर आधारित असल्याचे सांगितले. आपल्या डोळ्यांसमोर हळूहळू नाहीशी होत चाललेली संस्कृती, असे त्यांनी या कलाप्रकाराचे वर्णन केले. हा चित्रपट केवळ एक थ्रिलर नसून, तो सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचा एक प्रयत्न आहे. महाराष्ट्रात ग्रामीण संस्कृतीचे असंख्य घटक आहेत आणि गोंधळ ही त्यापैकी सर्वात शक्तिशाली अभिव्यक्ती आहे, असे ते म्हणाले.

अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. मी माझ्या गावात गोंधळात भाग घेत मोठा झालो. हे केवळ एक नृत्य नाही, तर संपूर्ण समुदायाला जिवंत करणे आहे. पारंपरिक गोंधळामध्ये, लग्नानंतरचे सादरीकरण ही समस्यामुक्त वैवाहिक जीवनासाठी केलेली प्रार्थना असते. या चित्रपटात, कथा गाणी आणि गोंधळाच्या माध्यमातून सांगितली गेली आहेत. ही एक उत्कृष्ट सिनेमॅटिक कल्पना आहे. खरी किमया म्हणजे विस्मरण. कलाकार म्हणून आपण चित्रिकरणासाठी जाताना स्वतःच्या कलेचा किंवा अनुभवाचा विचार घेऊन जाऊ नये. पटकथेतच सर्व काही अंतर्भूत असते. अनेकदा दिग्दर्शकाला फक्त तुमच्याकडून संवाद उच्चारून घ्यायचा असतो, कारण भावना आधीच त्या शब्दांत जिवंत असतात. प्रत्येक वेळी अभिनय करणे आवश्यक नसते, असे त्यांनी सांगितले.

परंपरेचे जतन आणि मराठी सिनेमाला नवा मापदंड 

संतोषसाठी ‘गोंधळ’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तो लहानपणी आजी-आजोबांसोबत गोंधळाच्या कार्यक्रमांना जात असे. त्यावेळी स्वयंपाक सामूहिकरीत्या तयार केला जात असे. अत्यंत सुमार आणि साध्या प्रकाशयोजनेत फक्त चार वाद्यांच्या साथीने गाणी सादर केली जात. आज आचारी येतात, पारंपरिक वाद्यांसोबत कीबोर्ड वाजतो, रंगमंचीय पद्धतीने प्रकाशयोजना केली जाते. आहे तसाच, अस्सल गोंधळ पुढील पिढ्यांसाठी टिपून ठेवण्याची इच्छा आहे. एका रात्रीत चित्रिकरण केल्याने खर्च कमी झाला. वेषभूषा बदलावी लागली नाही. त्यामुळे अस्सल गोंधळाचा अनुभवही कायम राहिला, असे संतोष म्हणाले. चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या उपक्रम चांगला असला तरी बजेटमध्ये वाढ होत नाही आणि त्यामुळे अनेक अडचणी  निर्माण होतात. बजेट कमी असेल तर पडद्यावरची भव्यता, तपशील इत्यादी घटते. कथा जिवंत करायची असेल तर पटकथेत काटछाट करून चालत नाही, असे त्यांनी सांगितले.

या संवादातून एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली की, ‘गोंधळ’ हा भूतकाळ आणि वर्तमान, परंपरा आणि वास्तव, स्मृती आणि आधुनिकता यांना जोडणारा दुवा आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्याने निर्मितीप्रक्रियेचे स्तर उलगडल्याने ही पत्रकार परिषद अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या एका कलावैभवाला केलेले अभिवादन ठरली.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content