Homeचिट चॅटसरकारच्या आधी वादळग्रस्तांकडे...

सरकारच्या आधी वादळग्रस्तांकडे पोहोचली ‘घुंगुरकाठी’!

‘तौक्ते’ वादळाचा तडाखा बसलेल्या दांडी, वायरी, तारकर्ली (मालवण) येथील ९ आणि मांडकुली (कुडाळ) येथील २ नागरिकांना ‘घुंगुरकाठी, सिंधुदूर्ग’ सेवाभावी संस्थेमार्फत पस्तीस हजार रूपयांच्या रोख रकमेचे वाटप करण्यात आले. मालवणचे सुपुत्र व निवृत्त नौदल अधिकारी कमांडर राजीव कुबल यांच्या ‘उर्जा’ संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

सरकारची मदत येण्याआधी स्वयंसेवी संस्था मदतीला धावून आल्याबद्दल वादळग्रस्तांनी समाधान व्यक्त केले. पुढच्या टप्प्यात अन्य ठिकाणच्या वादळग्रस्तांनाही जमेल तशी मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत व सामाजिक कार्यकर्ते प्रा. श्रीधर पेडणेकर यांनी दिली.

कमांडर राजीव कुबल यांनी भारतीय सेनादलातील आपल्या निवृत्त सहकाऱ्यांकडे, मित्रपरिवाराकडे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वादळग्रस्तांसाठी निधी उभारण्याची कल्पना मांडली. या मदतीचे योग्य लाभार्थ्यांना वितरण व्हावे, यासाठी प्रा. श्रीधर पेडणेकर यांच्यामार्फत ‘घुंगुरकाठी’ संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी त्यांना पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. यानंतर पहिल्या टप्प्यात जमा झालेली रक्कम त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केली. या रकमेचे वाटप गरजू नागरिकांना करण्यात आले.

निधीसंकलनाचे काम अद्याप सुरू असून यापुढेही अन्य ठिकाणच्या वादळग्रस्तांना यथाशक्ती मदत करण्यात येणार आहे. देण्यात आलेली रक्कम अगदी छोटी असली तरी निसर्गाच्या कोपाचा फटका बसलेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी देण्याचा हा उपक्रम आहे. या रकमेमुळे त्यांच्या दैनंदिन गरजा काही प्रमाणात पूर्ण होतील, असे लळीत यांनी सांगितले.

मदतीची रक्कम स्वीकारताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आतापर्यंत अनेकजण येऊन गेले, पण रोख रक्कम स्वरुपात मदत घेऊन येणारे तुम्ही पहिलेच, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी व्यक्त केली. नीतिन प्रदीप लोणे (५०००), सतीश चांदेरकर (२०००), शुभांगी चांदेरकर (२०००) (सर्व रा. दांडी), दत्ताराम कद्रेकर (३०००), राजश्री बांदिवडेकर (२०००), महेंद्र मयेकर (४०००), कृष्णा गोसावी (५०००) (सर्व रा. वायरी), सुमन तावडे (३०००), भिसाजी मिठबावकर (३०००) (सर्व रा. तारकर्ली), संजय मोरजकर (३०००), आनंद नाईक (३०००) (सर्व रा. मांडकुली, ता. कुडाळ) यांना त्यांच्या घरी जाऊन ही मदत पोच करण्यात आली. या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जळवी (तेर्सेबांबर्डे), अक्षय रेवंडकर (वायरी, मालवण), शुभेन्दू लळीत यांनी सहकार्य केले.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content