Homeडेली पल्सअवकाळी, गारपिटीमुळे उत्तर...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही निसर्गाने शेतकऱ्यांची साथ दिली नाही. ऐन रब्बी काढणीच्या काळात अवकाळीचे संकट कोसळले.

उत्तर महाराष्ट्र (खान्देश): नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खानगाव, कोटमगाव आणि लासलगाव परिसरात गारपिटीने द्राक्षबागांची पाने झडली, वेल जमिनीवर कोसळले; काढणीला आलेला गहू व कांदाही भिजला. नाशिकच्याच देवळा तालुक्यात रामनगर, ओबारा व दहिवड परिसरात कांदा, डाळिंब, गहू आणि कांद्याच्या टोंगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. खान्देशात धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर, शिंदखेडा भागात पाऊस व वादळाने सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवरील पिके हातची गेली. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांनाही जोरदार फटका बसला.

अवकाळी

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागा व भाजीपाल्याला मोठा फटका बसला. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात गारपीट व वादळाने गहू, आंबा, टरबूज, केळी आणि हळदीचे नुकसान झाले. लातूर व धाराशिव जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होऊन पिकांची मोठी हानी झाली.

विदर्भ: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड व पुसद तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हरभरा, पालेभाज्या व फुलशेतीला तडाखा बसला. वर्धा जिल्ह्यातील वाघोली शिवारात टरबूज पीक जमिनीवर आडवे झाले; हिंगणघाट, देवळी व समुद्रपूर तालुक्यांतही गहू-हरभरा-भाजीपाल्याचे नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गारपिटीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कोकण: कोकणात यावेळी अवकाळी पावसाचे थेट संकट तुलनेने कमी होते. मात्र मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत उष्ण-दमट हवामान राहिले.

एकूणच, रब्बी काढणीच्या अखेरच्या टप्प्यात आलेल्या या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असून तातडीने पंचनामे व भरपाईची मागणी जोर धरत आहे.

Continue reading

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...

‘महिला आरक्षण’ हे जातीनिहाय जनगणनेला बगल देण्याचे षडयंत्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला आरक्षणाचा वापर केवळ जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकार मुख्य मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष भरकटवत असल्याची टीका त्यांनी केली. सोनिया गांधी यांच्या मते, सरकारला देशातील...

जगातल्या १० सर्वात उष्ण शहरांत अकोला दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. 'एल डोराडो वेदर' आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला...
Skip to content