Homeडेली पल्सअवकाळी, गारपिटीमुळे उत्तर...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही निसर्गाने शेतकऱ्यांची साथ दिली नाही. ऐन रब्बी काढणीच्या काळात अवकाळीचे संकट कोसळले.

उत्तर महाराष्ट्र (खान्देश): नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खानगाव, कोटमगाव आणि लासलगाव परिसरात गारपिटीने द्राक्षबागांची पाने झडली, वेल जमिनीवर कोसळले; काढणीला आलेला गहू व कांदाही भिजला. नाशिकच्याच देवळा तालुक्यात रामनगर, ओबारा व दहिवड परिसरात कांदा, डाळिंब, गहू आणि कांद्याच्या टोंगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. खान्देशात धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर, शिंदखेडा भागात पाऊस व वादळाने सुमारे १६ ते १७ हजार हेक्टरवरील पिके हातची गेली. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांनाही जोरदार फटका बसला.

अवकाळी

मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात गारपिटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. गहू, ज्वारी, बाजरीसह फळबागा व भाजीपाल्याला मोठा फटका बसला. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात गारपीट व वादळाने गहू, आंबा, टरबूज, केळी आणि हळदीचे नुकसान झाले. लातूर व धाराशिव जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होऊन पिकांची मोठी हानी झाली.

विदर्भ: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड व पुसद तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हरभरा, पालेभाज्या व फुलशेतीला तडाखा बसला. वर्धा जिल्ह्यातील वाघोली शिवारात टरबूज पीक जमिनीवर आडवे झाले; हिंगणघाट, देवळी व समुद्रपूर तालुक्यांतही गहू-हरभरा-भाजीपाल्याचे नुकसान झाले. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गारपिटीने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

कोकण: कोकणात यावेळी अवकाळी पावसाचे थेट संकट तुलनेने कमी होते. मात्र मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत उष्ण-दमट हवामान राहिले.

एकूणच, रब्बी काढणीच्या अखेरच्या टप्प्यात आलेल्या या संकटाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असून तातडीने पंचनामे व भरपाईची मागणी जोर धरत आहे.

Continue reading

हॉलिवूड नगरीत मराठी अस्मितेचा झंझावात! ‘नाफा’ चित्रपट महोत्सवाला तुफानी प्रतिसाद!!

महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने गेल्या आठवड्यात अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) मराठी फिल्म फेस्टिव्हल २०२६चा तीन दिवसांचा दिमाखदार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अमेरिकेतील भारतीय आणि मराठी रसिकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संपूर्ण महोत्सवाला...

ओडिसी नृत्यगुरु शुभदा वराडकर राष्ट्रीय स्तरावर सन्मानित

मुंबईतल्या बोरीवलीमधल्या अभिनव नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या ओडिसी नृत्याच्या समर्पित कलासाधिका गुरु शुभदा वराडकर यांच्या कलासाधनेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीमार्फत दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य व पारंपारिक कलांच्या विविध क्षेत्रातील कलाकारांना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान...

कीर्तिकरांच्या पुढाकाराने शरीरसौष्ठवाला नवी ताकद; ५ संघटना एकवटल्या!

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने...
Skip to content