Homeन्यूज अँड व्ह्यूजअजितदादांना नामोहरम करण्याचा...

अजितदादांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न?

गेले सुमारे सव्वा महिना राज्यभर गाजत असलेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्त्याप्रकारण संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना व त्यात अपेक्षित यश दृष्टीपथात असतानाच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचा आरोपाचा ‘नगारा’ सतत का वाजत आहे, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी सरपंच हत्त्याप्रकरणी सर्वाना शांत करण्याचे प्रशासकीय प्रयत्न सुरु असून त्यात मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे संबंधित यंत्रणाच्या हवाल्याने वृत्त दिले असतानाही आमदार धस यांची लॉन्ग प्लेयिंग रेकॉर्ड मात्र अजून सुरूच असल्याने भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नामोहरम करायचे आहे असे दिसतेय.

सरपंच हत्त्याप्रकरणातील मुख्य आरोपीना मकोका लावल्यानंतरही धस यांचा आरोपांचा नगारा सुरूच असल्याने वेगवेगळे राजकीय तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड हाही जे्रबंद असल्याने आता धस यांनी दमाने घ्यावे असे गृहमंत्री फडणवीस यांच्यासह सर्वांनाच वाटत असताना जर आमदार धस आपले कीर्तन सुरु ठेवणार असतील तर आम्हालाही दररोज धस यांच्यावरही संकीर्तन करायला नक्कीच आवडेल, असा इशारा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने माझ्याशी बोलताना दिला.

बीड जिह्यात आमदार धस यांच्याबाबतही अनेक कहाण्या व पोलीस तक्रारी अजूनही मौजूद असून त्या तक्रारींपैकी एकेक तक्रारीचे पारायण रोज करायचे म्हटल्यास एक मोठा धस महाग्रंथ नक्कीच तयार होईल यात शंका नाही, असे ठासून सांगून या नेत्याने २६ मे २०११ रोजीचा एक किस्साच सांगितला. हा किस्सा आहे जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाईन भरतीचा. ऑनलाईन भरतीचा विषय निघताच तत्कालीन आमदार धस म्हणाले होते की, ‘कसल्ल्या ऑनलाईन भरत्या? आम्ही म्हणू तिथेच आमची माणसे जातील. उचला रे ते सर्व सामान..’ असे सांगून ते सर्व सामान घेऊन निघून गेले. अर्थातच ऑनलाईन भरती बोंबललीच, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. याबाबत संबंधित पोलिसांकडे तक्रारही करू दिली नाही. तक्रार देण्यास एक उपजिल्हाधिकारी गेला असता त्याला तुम्हाला येथे राहायचे आहे की नाही अशी धमकी कुणी दिली हे कागदोपत्री नमूद आहे, असे ते म्हणाले.

सरपंच हत्त्या प्रकारणानंतर धस महाराज दररोज इंस्टाग्रामवर कीर्तन करतात. त्याच्या क्लिप्स गृह मंत्रालयाने तपासाव्यात. एका क्लिपमध्ये त्यांनीच स्वतः दोन लग्ने केल्याचे फुशारकीने सांगितले आहे. देशात एकपत्नी कायदा असताना त्यांनी कुठल्या कायद्याने दोन लग्ने केली हे जाहीर करावे. भाजप संबंधात एखादी आगळीक करणारी एखादी पोस्ट फेसबुक वा अन्यत्र आली तर आयटी सेल ती पोस्ट अलगद बाहेर काढून तिची विल्हेवाट लावते. मग धस महाराजांवर ती इतकी मेहरबानी का?, असा सवालही या नेत्याने विचारला.

बीड जिल्ह्यातील संतापजनक धंदा म्हणजे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करणे. या ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यापासून तो वरपर्यंत अधिकाऱ्यांच्या नावाचे खोटे शिक्के तयार करणे व गावाकऱ्यांना देणे आणि त्यापासून लाखो रुपये उकळणे हा बीड व परळीतील सोनेरी टोळीचा उद्योग आहे. याबाबत धस साहेबांनी कधी ब्र उच्चारलेला आठवत नाही. याची आठवण करून देत हा नेता म्हणाला की सरपंच हत्त्या ही निंदनीयच आहे. पण त्याआडून साधू बनण्याचा आव आणून दादांना निशाणा करण्याचे काम आम्हाला कळत नाही का? मुख्यमंत्र्यांनी कारवाई करतो असे सांगून कार्यवाही सुरुही झालेली असताना ही धसगिरी कशाला?

Continue reading

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....
Skip to content