मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ सावरकर भक्त अरुण जोशी यांना प्रदान करण्यात आला. समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, तर प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. वि. स. जोग, तसेच समितीचे कार्याध्यक्ष शिरीष दामले, मिलिंद कानडे, महासचिव अनिल देव व्यासपीठावर उपस्थित होते.
हेमंत धर्माधिकारी यांनी गीत सादर केले. प्रास्ताविक अनिल देव, पाहुण्यांचा परिचय डॉ. अजय कुळकर्णी यांनी करून दिला. डॉ. संजय दुधे व डॉ. वि. स. जोग यांच्या हस्ते अरुण जोशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, 11 हजार रोख व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन श्याम देशपांडे यांनी केले. आरती जोशींचा सत्कार संध्या लाखे यांच्या हस्ते साडीचोळी देऊन करण्यात आला. सावरकर विचार मंचतर्फे वीरेंद्र देशपांडे, हिंदू महासभेतर्फे पद्मश्री तांबेकर, सावरकर विद्या भवनतर्फे कल्पना जोग तसेच शांतीनिकेतन कनिष्ठ महाविद्यालय, अरुण जोशी शिक्षण महाविद्यालयातर्फेही सत्कार करण्यात आला.
डॉ. संजय दुधे म्हणाले की, सावरकरांनी भाषाशुद्धी व लिपीशुद्धीसाठी चळवळ केली. देशाला आज सावरकरांच्या विचारांची गरज आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर देशभक्त, थोर क्रांतिकारक होते, तर डॉ. वि. स. जोग म्हणाले की सावरकर जातपात न मानणारे होते. तरीही त्यांना जातीयवादी ठरवले जाते. सावरकरांना सापत्नभाव का, असा सवालही डॉ. जोग यांनी केला. ते पुढे म्हणाले की, आज सावरकरांना भारतरत्न जाहीर व्हायला हवे होते. इतरांना दिले त्याचे समाधान आहेच. मात्र, सावरकरांना न दिल्याने विषाद वाटतो. यापुढे मी व समितीलाही सावरकरांना भारतरत्न द्या, अशी भिक्षा मागू देणार नाही.
अरुण जोशी यांनी, हा सन्मान म्हणजे सावरकर विचारांना अधिकाधिक देशभक्तांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न असून यापुढील काळातदेखील हे कार्य अविरतपणे सुरुच राहिल, असे सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले. चंद्रकांत लाखे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन डॉ. शुभा साठे, आभार प्रदर्शन अजय आचार्य यांनी केले. अनिल देव यांनी गायिलेल्या वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.