Homeडेली पल्स'पेड दर्शन'साठी मंदिरे,...

‘पेड दर्शन’साठी मंदिरे, पैशांसाठी थाटलेली दुकाने आहेत का?

पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का?, असा सवाल करत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी महाराष्ट्रातल्या मंदिरांमध्ये सुरू असलेली ‘पेड दर्शन’ पद्धत बंद करावी, अशी मागणी केली आहे.

त्र्यंबकेश्‍वर (नाशिक) येथील ज्योतिर्लिंग मंदिर संस्थानमध्ये भाविकांची आर्थिक लूट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्‍वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह गोटीराम पेहरे अन् अभिषेक कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. येथे २०० रुपयाचा अधिकृत पास असताना १० मिनिटांत दर्शनाचे आमीष दाखवून भाविकांकडून ३ ते १२ हजार रुपये मागितले जातात, असा प्रकार समोर आला आहे. हाच प्रकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात होत असून तेथे २०० रुपयांचा ‘पास’ देऊन विशेष दर्शन दिले जाते. हाच ‘पास’ नवरात्र काळात ३०० रु, ५०० रुपये आणि १ हजार रुपये करण्यात येतो. येथेही अनेकवेळा अतिरिक्त शुल्क घेऊन दर्शनासाठी सोडल्याच्या भक्तांच्या तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले.

मंदिर

खरेतर ‘सशुल्क दर्शनसेवा’ हा प्रकारच चुकीचा असून यामुळे भाविकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होते. दूरवरून येणार्‍या ज्या भक्तांकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचे? पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. देवाच्या दृष्टीने गरीब-श्रीमंत सर्व समान असल्याने प्रत्येकासाठी दर्शनाची पद्धत सारखीच असणे अपेक्षित आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का? त्याचसमवेत अशा पासचा काळाबाजार करण्याची वृत्ती सर्वत्र फोफावत आहे. त्यामुळे नाशिक, तुळजापूरसह राज्यातील सर्वच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमधील ‘सशुल्क दर्शनसेवा’ (पेड दर्शन) सुविधा बंद करावी, अशी मागणी सुनील घनवट यांनी केली आहे.

देवस्थानांमधील राजकीय नियुक्त्या बंद करा!

जेव्हा मंदिरे सरकार किंवा राजकीय नियुक्त्या असलेल्या समित्यांच्या कह्यात जातात, तेव्हा तिथे भक्तीऐवजी व्यापारी वृत्तीचा शिरकाव होतो. त्र्यंबकेश्‍वरमधील ही घटना म्हणजे मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणामच होय. ‘अतिथी देवो भव।’ मानणार्‍या भूमीत भाविकांना लुबाडण्यासाठी विश्‍वस्तांनीच यंत्रणा चालवावी, यासारखे दुसरे दुर्दैव नाही! त्र्यंबकेश्‍वर देवस्थानातील विश्‍वस्त नियुक्तीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी विश्‍वस्तांनी केला आहे. त्यामुळे या ‘पेड’ दर्शनाची सखोल चौकशी करून यात आणखी कुणाचा सहभाग आहे, याचेही अन्वेषण व्हावे, अशी मागणी मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. यापुढील काळात असे प्रकार टाळण्यासाठी देवस्थानांमध्ये विश्‍वस्त म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याऐवजी तिथे भक्त-भाविक म्हणून नेमणूक होणे आवश्यक आहे आणि यापुढे तसा बदल देवस्थानच्या घटनेत करावा, अशी मागणीही मंदिर महासंघाच्या वतीने  करण्यात येत असल्याचे घनवट म्हणाले.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content