Homeपब्लिक फिगरशनिवारपासून राज्यात होणार...

शनिवारपासून राज्यात होणार ‘अजित उत्सव’ साजरा!

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा वाढदिवस येत्या २२ जुलैला असून राष्ट्रवादीच्यावतीने २२ ते ३१ जुलै हा सप्ताह ‘अजित उत्सव’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल दिली. महाराष्ट्रातील शेतकरी पेरण्या न झाल्याने संकटात आहे याची जाणीव असल्याने या वाढदिवसाचे प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार त्यांनी सांगितले.

अजितदादांच्या राजकारणाची सुरुवात समाजकारणापासून सहकार क्षेत्र, शिक्षण, कला, क्रीडापासून झाली. ज्या-ज्या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये काही काळ लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, राज्य सहकारी बँकेचे प्रमुख, विधानसभा सदस्य, मंत्री, विविध खात्याचा पदभार, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रदीर्घ राजकीय प्रवास करत असताना अजित पवार यांनी विकासाला महत्त्व दिले आहे. सर्वांना न्याय देण्याची भूमिका ठेवली. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे. काहींना तो आवडत नसेल. मात्र महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या पद्धतीने तो रुचला आहे. अजितदादांच्या नेतृत्त्वाची एक वेगळी झलक महाराष्ट्राने दीर्घकाळ अनुभवली आहे. महाराष्ट्रातील तरुणाईसुद्धा त्यांच्या नेतृत्त्वाकडे आकर्षित झालेली पाहायला मिळत आहे, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमात सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा विचार आम्ही केला आहे. मॅरेथॉन स्पर्धा, रक्तदान शिबिर, शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यवाटप, वॉटरफिल्टर, छत्रीवाटप, शाळकरी मुलींना सायकली मोफत देण्याचा कार्यक्रम, वृक्षलागवड, ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी भेटी, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, अजितदादा जसे सकाळी सहा वाजता उठतात, तसंच ग्रामस्वच्छता अभियानासाठी दोन तास देणे असा सामाजिक उपक्रम राज्यभर सप्ताहाच्या कालावधीत राबवला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

महिलांसाठी रोजगार प्रशिक्षण, त्यामध्ये लघु, मध्यम उद्योग, खादी ग्रामोद्योग भारत सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून ३५ टक्के अनुदानातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची संधी, महिला कोणता व्यवसाय घेऊ शकतात याचे मार्गदर्शन आणि व्यवसाय निवडल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकातून त्यांना कर्ज कसे उपलब्ध होईल, त्यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल असा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जाणार आहे. याशिवाय महिला आरोग्यविषयक शिबीरेही घेतली जातील. या शिबिरात गंभीर आजाराचे निदान झाल्यावर त्या रुग्णाला उपचार कसे मिळतील याचे नियोजनही करण्यात आले आहे, असेही तटकरे म्हणाले.

बेरोजगारी आणि युवक हा प्रश्न संबंध राज्यात आहे. त्यामुळे युवक राष्ट्रवादीच्यावतीने प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली ‘रोजगार नोकरी महोत्सव’ मेळावा राज्यात आयोजित करणार आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील राहणार आहोत. याशिवाय राज्यसरकार जी रिक्त पदांची भरती करणार आहे त्याची माहिती व प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न या उपक्रमात अंतर्भूत केला आहे. इनडोअर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. याशिवाय युवती राष्ट्रवादीच्यावतीने राज्यातील युवतींसाठी शाळा व महाविद्यालयात ‘स्वसंरक्षण शिबीरे’ आयोजित केली जाणार आहेत. अजितदादांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात व देशभरात त्यांची ओळख विलक्षण पद्धतीच्या कामाचा झपाटा, अचूक वेळ आणि मेहनत करण्याची असलेली क्षमता या त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित सर्वच सामाजिक उपक्रम या सप्ताहात साजरे केले जाणार आहेत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content