Homeन्यूज अँड व्ह्यूजमहाडच्या ऐतिहासिक भूमीतून...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये ‘महाड चवदार तळे सत्याग्रह – शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात’ प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा’चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा संदेश याच भूमीतून दिला. तर, चवदार तळ्याच्या आंदोलनातून स्वराज्य हे समतेसह असायला हवे, असा ‘समता स्थापनेचा’ संदेश महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.

चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारतीय इतिहासातील एक अत्यंत निर्णायक टप्पा ठरला. ऑगस्ट 1923मध्ये तत्कालीन मुंबई विधान परिषदेने सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतरही समाजातील वंचितांना पाणी घेण्यापासून रोखण्याचे प्रकार सुरूच राहिले. हा अन्याय दूर करण्यासाठी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून प्रदीर्घ लढा दिला. त्यांच्या या संघर्षामुळे केवळ चवदार तळेच नव्हे, तर देशभरातील सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेचा संदेश प्रस्थापित झाला, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, यंदाचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असून, क्रांतीसूर्य म. ज्योतिबा फुले यांचे 200वे जयंतीवर्ष व थोर संत श्री गाडगे महाराज यांचे 150वे जयंतीवर्ष आहे. तसेच, आजपासून चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षास सुरुवात होत आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाने हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, चवदार तळ्याच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले असून तळ्याचे पाणी निर्मळ राहील, अशा पद्धतीने विकास केला जाईल.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील ज्या व्यक्तींवर जातीभेदातून अत्याचार झाले आणि ज्यांना प्राण गमवावा लागला, त्यांच्या वारसांना आज थेट शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रेसुद्धा वितरित केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, आदिती तटकरे, भरत गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, सुनील तटकरे, डॉ. ज्योती वाघमारे, आमदार प्रवीण दरेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content