समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे, खोडसाळ आणि पूर्वग्रहदूषित आहेत. ते आमचे मित्र आहेत. पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्याबाबतीत घेतलेली भूमिका चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम त्यांनी थांबावावं. या प्रकरणाला जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज या प्रकरणात उडी घेतली.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी रोजच्या रोज वानखेडेंवर एकापेक्षा एक गंभीर आरोपांची राळ उठवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आज एक पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांचे समर्थन केले.. समीर वानखेडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा, असा ईशाराही आठवले यांनी दिला.
आर्यन खान यांच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तत्काळ आर्यन खान यांना जमीन दिला असता. याबाबत वानखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग करीत आहे. तेच काम वानखेडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नाही. याउलट अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे, असेही ते म्हणाले.
समीर वानखेडे नार्कोटिकस कंट्रोल ब्युरो (NCB)चे प्रमुख अधिकारी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. नवाब मलिक यांच्या जावयावर यापूर्वी त्यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून ते वानखेडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार करीत आहे, असा आरोपही आठवले यांनी केला.
अशाप्रकाराचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे. त्या निर्णयासाठी फक्त वानखेडे या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जबाबदार धरणं चुकीचं आहे. नवाब मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई हा वानखेडे यांच्या कर्तव्याचा भाग होता. जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत, असेही ते म्हणाले. समीर वानखेडे हे मागासवर्गीय अधिकारी असून त्यांच्यावर अशाप्रकारचे आघात होणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा निर्धारही रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

