कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि.मी.चे काम जलदगतीने सुरू करण्याची मागणी तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
रोहित पवार यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेतली. संत एकनाथ महाराज, संत भगवान बाबा, संत गीतेबाबा, संत गोरोबा कुंभार यासारख्या प्रख्यात संतांच्या पालख्या आणि लाखो यात्रेकरूंसह अनेक दिंड्या या मार्गाने पंढरपूरला जात असतात. खर्डा गावापर्यंतच्या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर आहे. मात्र, खर्डा ते कुर्डुवाडीपर्यंतचा पुढील भाग अद्याप प्रलंबित आहे. त्यासाठी पुरेसा निधी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.
कोरोना महामारी काळात १३ हजार कि.मी.चे रस्ते निर्माणाचे कार्य करून नवा विक्रम केल्याबद्दल त्यांनी गडकरी यांचे अभिनंदन केले. मतदारसंघातील श्रीगोंदा आणि जामखेड येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ ड याचे पुनर्निर्माण आणि नूतनीकरण करण्यासंदर्भात आणि अहमदनगर-सोलापूर यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५१६ अ या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. करमाळा मतदारसंघातील जातेगाव ते टेंभुर्णी हा रस्ता NHAI कडे हस्तांतरित करण्यासाठी आ. संजयमामा शिंदे यासाठी प्रयत्न करत असून करमाळ्याच्या वतीने आमदार रोहित यांनीही पाठपुरावा केला.
याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांनीही यासाठी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले होते. या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यांच्या कामाच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी वेळ देण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली.

अहमदनगर ते जामखेड, बीड आणि दुर्गम भागातील गावे, जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ चे ५१ किमी अंतराचे काम मागील वर्षी पूर्ण झाले आहे. मात्र साबळखेड – आष्टी – चिंचपूर – जामखेड येथून २० किलोमीटरचा पॅच गेल्या ६ वर्षांपासून रखडला आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गाची अधिकच दुरवस्था झाली आहे. त्यावर वाहने चालवणे अशक्य आहे. हा रस्ता मराठवाडा व अहमदनगरला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्त्यांच्या या कामासाठी पुरेसा निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी नितीन गडकरी यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन त्यांनी कर्जत-जामखेड अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ किंवा AIBP (Accelerated Irrigation Benefit Programme) या दोन योजनांपैकी एखादी योजना मतदारसंघात लागू करावी, या मागणीवर चर्चा केली.
केंद्रीय दळणवळण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मतदारसंघातील मोबाईल नेटवर्कची समस्या दूर करण्याची विनंती केली. केंद्राने भारताच्या बीपीओ उद्योगाला लहान शहरांमध्ये स्थापन करून समतोल विकास साधावा आणि टपाल खात्याच्या लोकहिताच्या काही योजना कर्जत-जामखेड मतदारसंघात गावपातळीपर्यंत पोहोचवण्यावरही त्यांनी चर्चा केली.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन खर्डा किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या ‘स्वराज्य ध्वजा’च्या कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले. दसऱ्याच्या दिवशी गावी कार्यक्रम असल्याने प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही तरी व्हिडीओ व अन्य माध्यमातून कार्यक्रमासाठी शुभेच्छा पाठवेन असे आश्वासन सिंधियाजी यांनी यावेळी दिले.
केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंग यांची भेट घेऊन रोहित पवार यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील तरतुदी, सूट आणि विस्तार याबाबत चर्चा केली. कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीणचे जवळपास १० हजार लाभार्थी आहेत. यामध्ये काही लाभार्थ्यांच्या घरांचे हप्ते बाकी आहेत, काही नागरिकांची नाव ही ‘ड’- यादीमध्ये येऊनसुद्धा त्यांची नावे काही कारणांनी वगळण्यात आली आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या निवारणासाठी राबविण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या दारी’ आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून अशा अनेक अडचणी कर्जत-जामखेड मतदारसंघात असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

