केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय, पुणे व पत्र सूचना कार्यालय, मुंबई यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी माहितीवर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन नवी मुंबईमधील बेलापूरच्या केंद्रीय सदन येथे कालपासून सुरू झाले आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील दुर्लक्षित नायक अर्थात अज्ञात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान लक्षात आणून देणे, हा उद्देश यामागे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट आठवडा “आयकॉनिक वीक” म्हणून साजरा करत आहे. याअंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत.
या चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग आणि विशेष अथिती म्हणून सीआरपीएफ, पश्चिम विभागाचे आयजीपी रणदीप दत्ता उपस्थित होते.

चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सिंग म्हणाले की, या प्रदर्शनात आजवर अज्ञात राहिलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रं आहेत, ज्यांच्याबद्दल नव्याने कळते आहे. देशाला स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी लढा दिला, त्यांच्याबद्दल जाणून घेणे समाधान देणारे होते. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, अनेकांनी त्यासाठी प्राण दिले आहेत. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी इतिहासातील या सर्व महान व्यक्तींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे.

याप्रसंगी सी.बी.आय.च्या विशेष गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस आधीक्षक एस. आर. सिंग; जलद कृती दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण घाग, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे; सीपीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता जयंत शेकोकर, सयद मोहमद असद, आशिष गुप्ता आदी उपस्थित होते.

कोविड संबंधित नियमांचे पालन करून सर्व स्थानिक सरकारी कार्यालयातील अधिकारी–कर्मचारीवर्ग, विद्यार्थी आणि इतर नागरिक यांच्यासाठी 24 ते 27 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असेल. भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित पुस्तकांचे प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्रीदेखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

“आयकॉनिक वीक”अंतर्गत अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, नांदेड, पुणे, नागपूर, वर्धा, अमरावती, गडचिरोली आणि मडगाव, गोवा या ठिकाणी प्रादेशिक लोक संपर्क कार्यालय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकांमध्ये जाऊन साजरा करणार आहे. याअंतर्गत परिसंवाद, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानींचा सत्कार, सायकल फेरी, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, स्वातंत्र्याचे पोवाडे गायन, कलासादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम घेतला जाणार आहे.

