मुंबई महापालिकेच्या पांजरापूर संकुलातील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ९०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याच्या कामकाजासाठी गुरुवार २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार, २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता सदर उदंचन केंद्र बंद राहणार आहे. या कारणाने पश्चिम उपनगरे, शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरातील काही विभागांचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पालिकेतर्फे पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्रामध्ये ८० दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा एक नवीन उदंचन संच बसविण्यात येणार आहे. हा उदंचन संच बसविण्यापूर्वी ९०० मिलीमिटर व्यासाची एक नवीन झडप बसविण्यात येणार आहे. त्यामुळे पांजरापूर येथील मुंबई ३ अ उदंचन केंद्र गुरुवार, २६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून शुक्रवार, २७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत असे एकूण २४ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे.
परिणामी भांडुप संकुलास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये सुमारे १० टक्के पाणीकपात होईल. या कारणाने, उपरोक्त कालावधीत भांडुप संकुलद्वारे होणाऱया पश्चिम उपनगरे तसेच शहर भागातील एफ/दक्षिण व एफ/उत्तर वगळून सर्व विभाग तर पूर्व उपनगरातील एल व एन विभागात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
या कालावधीतील पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, पाणीकपातीच्या काळात काटकसरीने पाणी वापरुन पालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

