ज्यांना फक्त जत्रेचाच अनुभव आहे त्यांना यात्रा काय समजणार? प्रत्येकाचे आपले आपले आकलन असते, आपला आपला समज असतो. त्यांना काय सांगणार? एक मात्र खरे की, या चारही जन आशिर्वाद यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राज्यातले हे सरकार मात्र हादरून गेले आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.
टी.व्हीजे.ए. आणि मी मुंबईकर अभियानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे उद्घाटन केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे राज्य सरकार लक्ष देत नाही. मंत्रालयात विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी आहे. आता तरी त्यांचा प्रश्न सरकारने सोडविला पाहिजे, असेही ते म्हणाले.
शिवस्मारकाचे काम पुढे नेण्यासाठी राज्य सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आतातरी हा प्रयत्न सरकार करेल, अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने कोरोना काळात ई-संजीवनी टेलिमेडिसीन सेवा दिली. यात ६० हजारांहून जास्त डॉक्टर तसेच पॅरामेडिकल स्टाफ सहभागी जाला. टेलि-कन्सल्टेशनच्या माध्यमातून ९० लाखांहून जास्त लोकांना लाभ झाला. दररोज सरासरी ७० हजारांना फायदा झाला. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत २ कोटी नागरिक आतापर्यंत लाभान्वित झाले. २५ हजार कोटींचे उपचार करण्यात आले. २३ हजार संलग्न रूगणालयांमधून ही सेवा देण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून २३.६६ कोटी लोकांना मदत करण्यात आली. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे १०.५३ तर अटल पेन्शन योजनेद्वारे ३.१३ कोटी लोकांना मदत झाली, असेही फडणवीस म्हणाले.

