महाराष्ट्र सध्या उन्हाच्या भीषण तडाख्याने होरपळून निघत असून, विदर्भातील तापमानाने जागतिक विक्रम मोडायला सुरुवात केली आहे. ‘एल डोराडो वेदर’ आणि हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जगातील १० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत विदर्भातील तब्बल ४ शहरांचा समावेश झाला आहे. यात अकोला हे जगातील दुसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. तापमानाचा ‘विदर्भी’ तडाखा सर्वसामान्य नागरिकांची परीक्षा घेणारा ठरत आहे. यात अकोला अव्वल आहे. अकोल्यात तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेला असून, ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर नोंदवले गेले आहे. टॉप १०मध्ये चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि वर्धा या शहरांचाही समावेश आहे. या शहरांमधील तापमान सातत्याने ४२ ते ४५ अंशांच्यादरम्यान राहत आहे.
५० अंशांची भीती
हवामान तज्ज्ञांच्या मते, जर उष्णतेची हीच लाट कायम राहिली, तर मे महिन्यात पारा ५० अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तापमान वाढण्याची नेमकी कारणे काय?
१. ग्लोबल वॉर्मिंग: जागतिक तापमान वाढीचा परिणाम स्थानिक हवामानावर होत आहे.
२. हॉट विंड्स (उष्ण वारे): उत्तर-पश्चिम भारताकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ होत आहे.
३. कमी झालेली वनसंपदा: शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे जमिनीची उष्णता शोषून घेण्याची क्षमता वाढली आहे.
४. भौगोलिक स्थिती: विदर्भाची पठारी भौगोलिक रचना सूर्याच्या किरणांना थेट आणि तीव्र बनवते.
उष्णतेची लाट आणखी किती दिवस?
भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, आगामी ५ ते ७ दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट (हीटवेव्ह) कायम राहणार आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत तापमानात मोठे चढउतार पाहायला मिळतील.
वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव कसा करायचा?
उष्माघातापासून (सन स्ट्रोक) वाचण्यासाठी खालील खबरदारी घेणे आवश्यक आहे.
काय करावे?
- भरपूर पाणी प्या: तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी, लिंबू सरबत, ताक किंवा नारळ पाणी प्या.
- पोशाख: बाहेर जाताना हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.
- संरक्षण: डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा आणि डोळ्यांसाठी सनग्लासेस वापरा.
- आहार: आहारात काकडी, टरबूज यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा.
काय टाळावे?
- वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा.
- पेये: चहा, कॉफी आणि मद्यपान टाळा, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
- शारीरिक श्रम: भर उन्हात कष्टाची किंवा व्यायामाची कामे करू नका.
लक्षणे ओळखा: जर चक्कर येणे, मळमळणे, तीव्र डोकेदुखी किंवा जास्त ताप जाणवत असेल, तर तो उष्माघात असू शकतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
निसर्गाचा कोप आणि वाढते सिमेंटचे जंगल यामुळे विदर्भ तापला आहे. स्वतःची काळजी घेणे हाच सध्या या उष्णतेपासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

