माझा एकच बाप – बाळासाहेब ठाकरे! आम्ही “मार्मिक”मुळे घडलो. आमची राजकीय जडणघडण “मार्मिक”मुळे आकाराला आली. जुना स्टँड, जळगाव जाऊन आम्ही मार्मिक घ्यायचो, तेव्हा सामनासुद्धा दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी यायचा. मार्मिक आम्ही 100% वाचून काढायचो. अशी माध्यमे हवीत, समाज घडवणारी अन् माणसे उभी करणारी, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
आपल्या देशाचे “भारत” हे नाव ज्या भूमीतून आले, त्या मुंबईतील सिद्धिविनायक महागणपतीच्या टिटवाळा शहरातून रविवारी दैनिक ‘जन सम्राट टाईम्स’चे दिमाखदार प्रकाशन गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडले. तत्पूर्वी, मंत्रीमहोदयांच्या हस्ते ‘जन सम्राट टाईम्स’ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, एक बातमी क्लिक करून त्यांनी ‘जन सम्राट टाईम्स’ वेबसाईटही खुली केली. याप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी, “वृत्तपत्रांमध्ये बातमीची खातरजमा करणारी यंत्रणा हवी,” अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘जन सम्राट टाईम्स’चे संपादक मुकुंदराव नंन्नवरे यांच्यासाठी गुलाबभाऊंनी टिटवाळावासियांना भावनिक आवाहन केले की, “माझा मुकुंद मी तुम्हाला सोपविला आहे, त्याला साथ-पाठबळ द्या!” संघर्षातून वर आलेला एक तळमळीचा कार्यकर्ता, प्रामाणिक पत्रकाराच्या धडपडीचे कौतुक करत पाटील यांनी आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिटवाळा पश्चिमेतील सिद्धेश्वर हाईट्स मैदानावर झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ आंबेडकरी नेते तानसेनभाई नन्नवरे, आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, भीम आर्मीचे नेते राजू झनके, तळोजा एमआयडीसीतील साई सिक्युरिटी सर्व्हिसेसचे राजेंद्र पाटील, नगरसेवक बंदेश जाधव, नगरसेविका तेजश्रीताई गायकवाड, जळगाव जि.प. सदस्य पवन सोनवणे, धरणगाव पं. स. समिती माजी सभापती सचिन पवार व अनिल पाटील, आरपीआय आठवले गटाचे टिटवाळा शहराध्यक्ष विजय भोईर, सनी जाधव, प्रमोद जाधव, पितांबर शिंदे, दिलीप राठोड, भरत पाटील, बीएन पाटील सर, सुनील पाटील, बबलू शेख, सुनील महाजन, ॲड. भारती सर, प्रवीण पाटील सर, प्रवीण वाणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

40 वर्षांचा संघर्ष करून माणसे आमदार होतात. माध्यमे चुकीच्या बातम्या दाखवून प्रतिमा मलीन करतात. त्यावर कॉमेंट्स करणारे साधे वॉर्डांत निवडून येत नाहीत. मी 5 वेळा आमदार झालो. मला कोणता पेपरवाला किंवा टीव्हीवाला चुकीची बातमी देऊन पाडू शकत नाही, मला लोक निवडून देतात. 33 हजार, 47 हजार आणि मागच्या वेळी 70 हजार – दरवेळी विजयी मतांचा फरक वाढतोय! वृत्तपत्रातील बातम्यांची खात्री करणारी यंत्रणा हवी. जे घडले, ते वस्तुस्थिती माध्यमांनी द्यायला हवे. मध्यंतरी एका माध्यमाने चुकीची बातमी देऊन मी मराठीविरोधी असल्याचे चित्र रंगविण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात मराठीचा हा मुद्दा मुंबईइतका तीव्र नाही, ग्रामीण भागात सगळेच मराठी आहेत. आता कोणता नेता, कोणत्या पक्षात नेम नाही? पक्ष कोणता असला तरी काम करणाऱ्याला फरक पडत नाही. आता सकाळी उठल्यावर, दर 15 दिवसांनी नेत्यांना भेटल्यावर विचारावे लागते – कुठल्या पक्षात आहे? सध्याची परिस्थिती विचित्र झाली आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
ध्येयवेड्याने समजावूनही ऐकले नाही
आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे अतिशय कठीण झाले आहे, असे सांगून गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही मुकुंदला किती समजावून सांगितले, की पेपर सुरू करण्याचा वेडेपणा करू नको, पण त्याने पक्के मनाशी ठरविलेले असल्याने त्याने ऐकले नाही. एका ध्येयवादाने झपाटून त्याने आता हा नवीन प्रवास सुरू केला आहे. आमचे 12 वर्षांचे स्नेहबंध आहेत. या कार्यक्रमासाठी मतदारसंघात “एसआरआर”साठी 5 आमदार आलेले असूनही मला 400 किलोमीटर प्रवास करून यावेच लागले. मला लोक प्रेमाने “भाऊ” म्हणतात. हे नाव उलटे केले की “उभा” होते. एक भाऊ म्हणून मी पूर्णतः मुकुंदच्या पाठीशी उभा आहे. पुढच्या वर्धापनदिनी “जन सम्राट टाईम्स”चा भव्य कार्यक्रम कल्याणमध्ये बंदिस्त सभागृहात होईल,” अशा शुभेच्छा गुलाबभाऊंनी दिल्या.

चळवळीच्या, सामाजिक बातम्यांना माध्यमात योग्य स्थान नाही
संपादक मुकुंदराव शामराव नंन्नवरे यांनी प्रास्ताविकात वृत्तपत्र सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. गेली 30 वर्षे सामाजिक चळवळ आणि 20 वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत घालवल्यानंतर अलीकडे चळवळीच्या आणि सामाजिक बातम्यांना योग्य स्थान मिळताना दिसत नाही. त्यासाठी पदरमोड करून हा खटाटोप असल्याचे त्यांनी सांगितले. तानसेनभाई नन्नवरे आणि देवेंद्र साळी यांचीही यावेळी भाषणे झाली.
या मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
टिटवाळातील नगरसेविका उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, दीपक कांबळे, मच्छिंद्र कांबळे, राजेंद्र मेखे, विलास भोईर, समाधान पाटील, पूजाताई जोगदंड, लीनाताई ठोंबे, ॲड..राजश्रीताई खरात, योगिताताई चौधरी, वाल्मीक जाधव, बौद्धाचार्य गौतम मोरे, केएल उघडे गुरुजी, रघुनाथ भोईर, बल्लाळ गुरुजी, गजानन लिंबोरे, प्रवीण रूपवते, नारायण तावडे, प्रा. भाऊराव गायकवाड आदी मान्यवरांनी सोहळ्यास उपस्थित राहून ‘जन सम्राट टाईम्स’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जगदीश सपकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. धीरज सोनवणे, गोविंद नन्नवरे, मनोज राजपूत, संदीप शेंडगे, आनंद इंगळे, अमोल गजरे, रोशन शेळके, चंदू जाधव, जितेंद्र कानडे, विवेक सपकाळे, वाल्मीक पाटील, अजय सोनवणे, सागर पाटील, सचिन नन्नवरे आदींनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

