मुंबईसारखीच परिस्थिती ठाणे शहर व आसपासच्या परिसराची झाली आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये! ती परिस्थिती म्हणजे परप्रांतीयांची घुसखोरी! हल्लीच्या भाषेत परप्रांतीय व स्थलांतरित या शब्दांना ‘ग्लोबल’ वेष्टन लावून विकण्याची पद्धत आहे. पण जे हे ग्लोबल लेबल लावून वस्तू वा विचार विकण्याचा प्रयत्न करतात ती मंडळी, परदेशातही आता स्थलांतरित व मूळ निवासी असा झगडा सुरु झाला असल्याचे मात्र सोयीस्कररित्या विसरतात! असो. विषय दुसरीकडेच जाण्याआधी विषयावर येतो. गेल्या पाच-सात वर्षांपासून ठाणे शहरातील नवरात्र व दिवाळी सणांच्यावेळी मार्केट परिसरातील रस्ते गुजरातच्या काठीयावाडी मंडळींच्या फेरीवाल्यांनी अडवल्याचे दिसत आहे. यात विशेष म्हणजे काठीयावाडी पुरुष मंडळी फारच कमी दिसतात. काठीयावाडी महिला मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, तलावपाळी परिसर, मनोरमा नगर, पाटलीपाडा, कोपरी आदी अनेक भागात मोठ्या प्रमाणावर काठीयावाडी महिला फेरीचा धंदा करताना दिसत आहेत.
ठाणे शहरच नाही तर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, पालघरमधील वसई, विरार, डहाणू आदी परिसरात ही मंडळी त्यांच्या लमाणांसह दिसत आहेत. मुंबईच्या पश्चिम व पूर्व उपनगरातही त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे. विशेषतः दहिसर, बोरिवली, कांदिवली, मुलुंड, भांडुप आदी ठिकाणी. खरंतर या विषयावर राजकारण करायचे नाही. पण हल्ली राजकीय टोमणेबाजी केल्याशिवाय साधे बोलताच येत नाही. या विषयावर राजकीय नेते काहीच बोलणार नाहीत. मात्र वस्तुस्थिती सांगणारच! ही सर्व काठीयावाडी मंडळी काठेवाडची आणि हा काठेवाड प्रदेश गुजरात राज्याच्या सौराष्ट्र परिसरात येतो. सौराष्ट्रात पटेल जमातीचे वर्चस्व आहे. पटेलांशिवाय तेथील राजकारणही हलत नाही. तसेच ही पटेल मंडळी बाकीच्यांना वर येऊ देत नाहीत. आता मुंबई व ठाणे शहरात काठीयावाडी मंडळी जर फेरीचा धंदा करू शकतात तर ही मंडळी गुजरातमधील सूरत, अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाणा, मणिनगर आदी शहरांत का फेरीचा धंदा का करत नाही, असे विचारले असता एक महिला दबक्या आवाजात म्हणाली की, ‘करवू नथी देता..’. कोण विचारले असता ‘सरकार अने पोलीस..’ असे सांगून तिने काढता पाय घेतला. नेमकी अशीच काहीशी परिस्थिती उत्तरेतून आलेल्या परप्रांतीयानी याआधीच व्यक्त केलेली आहे.

ठाणे शहरात काठेवाडी लमाणांचा तांडा नवरात्रीच्या आधी दोन-चार दिवसांपासून हजर होण्यास सुरुवात होते. टेंभीनाक्याच्या देवी उस्तवात कोर्टनाका परिसर, तालावपाळी परिसर आणि आनंदश्रम परिसर या काठेवाडी फेरीवाल्यांनी फुलून गेलेला असतो. ठाणे शहरातील एका प्रभावशाली नेत्याचा ‘राजा’ कार्यकर्ता (खरंतर हा नेताच आहे) या काठेवाडींची जुळवाजुळव करत असतो, अशी माहिती मिळाली. ही मंडळी ठाण्यात आल्यावर कोपरी, सिदार्थ नगर, आंबेडकर नगर, ठाणे क्रीडासंकुल, तालावपाळी, मनोरमा नगर, चितळसराच्या परिसरात आपला डेरा टाकतात. दिवसभर महिला मंडळी फेरीचा धंदा पाहतात. दिवसा त्यांच्याबरोबरची पुरुष मंडळी ‘चपटी’वर ताव मारतात व फेरीच्या बाजूलाच चपटीबरोबरच आडवे होतात. त्यांच्याबरोबर असलेली लहान मुले स्टेशन परिसरातील व तलावपाळी परसरातील खाऊ गल्लीत भिका मागत असतात. काही वर्षांपूर्वी चिखलीया नावाची व्यक्ती या काठेवाडींची सोय लावत असे.
फार पूर्वी पपू पदरिया नावाचा भाई या काठेवाडींनी ठाण्याला दिला होता, अशी माहितीही काही ज्येष्ठांनी दिली. तो गुंड असल्याने जनतेला तो खुलेआम त्रास देत असे. यंत्रणेलाही तो डोईजड झाल्याने अखेर पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्याला ‘ढगात’ पाठवले गेले. चिखलीयालाही पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी फरार व्हावे लागले होते. पूर्वी या काठेवाडी महिला गुजरातीबहुल वस्तीमध्ये दातणच्या काड्या विकण्याच्या व्यवसाय करत असत (दात घासण्यासाठी). भुलेश्वर, काळबादेवी, प्रिन्सेस स्ट्रीट आदी भागात या महिला कमरेवर दातणची मोळी घेऊन विक्री करत असत. आता त्याच्या बारीक काड्या करून विकतात. सांगण्याचा हेतू हा की, या काठेवाडी महिला वा पुरुष मुंबई प्रदेशात नवीन नाहीत, फक्त आता लोंढा वाढत आहे किंवा वाढला आहे इतकाच काय तो फरक. सर्वात मोठा फरक म्हणजे विकासाची भली मोठी तुतारी!
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर
या विषयावर कोणीही लिहिले की त्याला राजकारणाचा वास येतोच. मुंबईत आणि आजूबाजूच्या शहरांना या आणि अशाच परप्रांतीयांनी सर्वच बाबतीत जेरीस आणले आहे. अस्वच्छता आणि अतिक्रमणे , वरून दादागिरी याबाबतीत तर यांनी उच्छाद मांडला आहे. त्यांची राज्ये जर याबाबत कठोर पावले उचलत असताना फक्त महाराष्ट्रातच मानवता आणि मानवाधिकार यांचा महापूर का येतो. पदपथावरील भंगार विक्री च्या अनधिकृत अधिक्रमित टपऱ्या अधिकृत कशा होतात.