Skip to content
Homeब्लॅक अँड व्हाईटसनी थॉमसः भारतीय...

सनी थॉमसः भारतीय नेमबाजीचे ‘भिष्माचार्य’!

आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या विश्चात भारताची खरी ओळख करुन देणारे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ८४ वर्षीय केरळच्या सनी थॉमस यांनी काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. भारतीय नेमबाजीचे ते खऱ्या अर्थाने ‘भिष्माचार्य’ होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. अलिकडच्या काळात भारतीय नेमबाजांनी आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा जागतिक नेमबाजी विश्वावर उमटवला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतीय नेमबाज खोऱ्यानी पदके जिंकत असताना नवनव्या विक्रमालादेखील गवसणी घालत आहेत. परंतु या सर्वांचा खरा पाया थॉमस यांनी रचला असेच म्हणावे लागेल. १९९३ साली भारतीय नेमबाजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी थॉमस यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यानंतर भारतीय नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांत यशाची शिखरे काबीज करण्यास सुरुवात केली. जणू काही थॉमस यांनी जादूची कांडीच फिरवली आणि भारतीय नेमबाजीचा आलेख आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यास सुरुवात झाली. १९९०च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि त्यानंतर १९९२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी अत्यंत सुमार झाली, तेव्हा अखिल भारतीय नेमबाजी महासंघाचे अध्यक्ष असलेले कुमार सुरेंद्र सिंग आणि सचिव बलजितसिंग सेठी यांना भीती वाटू लागली की, केंद्र सरकार अव्वल खेळांच्या यादीमधून नेमबाजीला वगळेल. त्यामुळे नेमबाजांना आणि संघटनेला मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या सोयी, सवलती, सुविधा बंद होऊ शकतात. त्यामुळे या दोघांनी थेट कोटायमचा रस्ता धरला. त्यांनी सनी थॉमस यांची भेट घेतली.

आपणच आता भारतीय नेमबाजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी घ्यावी अशी गळ त्यांनी थॉमस यांना घातली. स्वतः उत्कृष्ट नेमबाज असलेल्या थॉमस यांनी सिंग आणि सेठी यांना होकार दिला. फक्त एकच अट थॉमस यांनी घातली, की केरळ, दिल्ली हा ट्रेनचा प्रवास दिड दिवसाचा आहे. त्यात बराच वेळ वाया जातो. तेव्हा मला विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करावी. मी दिल्लीत येण्यास तयार आहे. महासंघाने त्यांची अट मान्य केली. तेव्हापासून थॉमस यांचा नेहमी विमानानेच प्रवास असायचा. हा प्रवास करताकरता त्यांनी भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, असेच म्हणावे लागेल. प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या एकाच वर्षात त्यांचा शिष्य जसपाल राणाने जागतिक ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. त्यानंतर थॉमस यांची सुरू झालेली विजयी दौड जवळजवळ २ दशके सुरूच राहिली. या दोन दशकांच्या मोठ्या काळात त्यांनी भारताला एकापेक्षा एक सरस नेमबाज दिले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत ते प्रशिक्षक असताना भारताने १०८ सुवर्ण, ७४ रौप्य, ५३ कांस्य पदकांची घसघशीत कमाई केली. त्यामध्ये ५ ऑलिम्पिक स्पर्धा, ६ जागतिक स्पर्धा, जवळजवळ ५० वर्ल्डकप स्पर्धा, ६ आशियाई क्रीडा स्पर्धा, ५ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यांचा समावेश आहे.

२००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये राजवर्धन सिंग राठोडने रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिले रौप्यपदक नेमबाजीत भारताला मिळवून दिले. २००८च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्राने लक्ष्याचा अचूक वेध घेताना सुवर्णपदकाला गवसणी घालून भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासात नवा अध्याय रचला. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग, विजय कुमार जोडीने रौप्यपदकाची कमाई करुन नेमबाजीतील ऑलिम्पिकमधील पदकांची हॅटट्रिक पूर्ण केली. २००६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जसपाल राणाने सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधून भारतासाठी नवा विक्रम केला. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समरेश जंगने विक्रमी ५ सुवर्णपद‌कांची कमाई केली होती. हे सर्व नेमबाज थॉमस यांनीच घडवले होते.

दोन दशकांचा थॉमस यांचा प्रशिक्षकपदाचा प्रवास थक्क करणारा आहे. “सनी सर” या टोपणनावाने ते नेमबाजी विश्वात ओळखले जायचे. लहानपणापासूनच त्यांना नेगबाजीची आवड होती. त्यांच्या घरापासून काही किमी. अंतरावर जंगल असल्यामुळे वडिल नेहमीच छोट्या थॉमस यांना जंगल सफारीसाठी घेऊन जात असत. मग तेथेच करत असलेल्या लहानसहान शिकारीमधून थॉमस नेमबाजीकडे आकर्षित झाले. ५ वेळा त्यांनी केरळ राज्याचे नेमबाजीचे जेतेपद पटकावले. त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेतदेखील थॉमस यांनी सुवर्णपदक मिळविले. केरळ येथील कोट्टायाममधील उझावूरमध्ये सेंट स्टीफन्स कॉलेजात ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. १९९३ साली ते प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर लगेचच त्यांना अखिल भारतीय नेमबाजी महासंघाचा प्रशिक्षक म्हणून बुलावा आला. १९८०मध्ये अखिल भारतीय नेमबाजी महासंघाच्या प्रशिक्षक यादीत थॉमस यांचा समावेश होता. १९८२च्या नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत थॉमस यांची नेमबाजीच्या तांत्रिक समितीत निवड झाली होती. चीन, द. कोरिया, जपान, यूरोपीयन देशांचे वर्चस्व असलेल्या नेमबाजीत त्यांची मक्तेदारी मोडण्यास थॉमस यांनी भारतीय नेमबाजांना एक नवी उमेद मिळवून दिली. त्यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा रायफल, पिस्तूल, शॉटगन, या तीनही प्रकारात तेच भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. अलिकडच्या काही वर्षांत मात्र नेमबाजी महासंघाने तीनही प्रकारासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली. या तीनही प्रकाराची जबाबदारी त्याकाळात थॉमस यानी चोख पार पाडली. यासाठी त्यांना सलाम करावाच लागेल.

गुरु, मार्गदर्शक, पिता अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी सर्व खेळाडूंसाठी निभावली. खेळाडूंना त्यांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर करून आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी परिपूर्ण केले. त्यामुळेच ते प्रशिक्षक असताना भारतीय नेमबाजीला नवी झळाळी मिळाली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खेळाडूमधील गुणवत्ता ते अचूक हेरायचे, खेळाडूंना काय हवं-नको ह्याची परिपूर्ण जाण त्यांना होती. खेळाडूच्या शैलीत, तंत्रात त्यांनी कधीच बदल केला नाही. खेळाडूच्या कठीण समयी थॉमस सर नेहमीच ठामपणे उभे राहिले. त्यामुळे खेळाडूंचा विश्वास त्यांनी संपादन केला. खेळाडूंना जास्तीतजास्त सोयीसुविधा मिळण्यासाठी सरकारकडे नेहमीच थॉमस यांनी पाठपुरावा केला. २०१२च्या लंडन ऑलिम्पिकनंतर त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडले. त्यानंतर कोट्टागाम येथे त्यांनी रायफल क्लब अकादमी सुरू केली. तेथे युवा नेमबाजांना तयार करण्यास पुन्हा एकदा सरांनी प्रारंभ केला. पण, या अकादमीमधून एकही राष्ट्रीय विजेता तयार झाला नाही ही खंत सरांना शेवटपर्यंत जाणवत होती. २००१मध्ये केंद्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा उचित गौरव केला. अखिल भारतीय नेमबाजी महासंघाचे ते काही काळ उपाध्यक्षदेखील होते. रायफल, पिस्तूल, शॉटगन या तीनही प्रकारातील प्रशिक्षणवर्ग, शिबिर हे एकाच ठिकाणी असावे हा सरांचा नेहमीच आग्रह असायचा. त्यामुळे खेळाडूंमध्ये सांघिक भावना वाढण्यास खूप मदत झाली. ज्याचा फायदा भारतीय संघाला पुढे होत गेला. त्यांचाच शिष्य जसपाल राणा यालादेखील २०२०मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरांची दोन्ही मुले मनोज, सनील हे राज्य विजेते चांगले नेमबाज होते. सरांच्या जाण्यामुळे भारतीय नेमबाजीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी भरून येणे कठीणच आहे.

Continue reading

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयसला डावलल्याचीच चर्चा!

आजपासून यजमान इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या ५ सामन्यांच्या तेंडुलकर-अंडरसन चषकासाठीच्या कसोटी मालिकेत शुभमन गिलच्या पाहुण्या भारतीय संघाची खरी कसोटी लागणार आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गज भारतीय खेळाडूंच्या गैरहजेरीत भारत पहिल्यांदा कसोटी...

क्ले कोर्टवरचे नवे ‘राजा-राणी’!

टेनिस विश्वात लाल मातीच्या क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या एकमेव फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कराझ आणि अमेरिकेची कोको गॉफ हे आता नवे राजा-राणी झाले आहेत. फ्रांसमधील जगप्रसिद्ध पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या यंदाच्या स्पर्धेत टेनिसमधील या युवा खेळाडूंनी शानदार...

अखेर चौथ्या प्रयत्नात बेंगळुरूची बाजी!

यंदाच्या १८व्या प्रतिष्ठेच्या आय. पी. एल. चषक क्रिकेट स्पर्धेत अखेर आपल्या चौथ्या प्रयत्नात बेंगळुरू संघाने बाजी मारली. याअगोदर तीन वेळा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणाऱ्या बेंगळुरू संघाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. परंतु यंदा मात्र सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करणाऱ्या बेंगळुरूने...