सनातन वैदिक साहित्याचा व्रतस्थवृत्तीने, आत्मलोपी समर्पित भावाने गेली शंभर वर्षे प्रचार-प्रसार करणारी, जगविख्यात ‘गीता प्रेस गोरखपूर’ ही प्रकाशन संस्था केवळ संस्था नसून करोडो भारतीयांची आस्था आहे. गेल्या १०० वर्षाxत या संस्थेने ९८ कोटींपेक्षा अधिक ग्रंथांची विक्री करण्यासह अनेक विश्वविक्रम केलेले आहेत. देश-विदेशात दोन लाखांपेक्षा अधिक वर्गणीदार लाभलेले या संस्थेचे ‘कल्याण’ हिंदी मासिक सनातन विचाराचा प्रेरक दीपस्तंभ आहे. या संस्थेचे गीतासेवाव्रती प्रचारक जयदयालजी गोयंका, ‘कल्याण’चे आद्यसंपादक हनुमानप्रसाद पोद्दार यांचे कार्य अपूर्व व ऐतिहासिक आहे. हे कार्य हिंदू समाजावरील अक्षरऋण आहे. संतसाहित्याचे उपासक, अभ्यासक विद्याधर ताठे यांच्या लेखणीतून आकाराला आलेली, ‘यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची’ ही ग्रंथरचना वाचकांना त्या भावविश्वात घेऊन जाणारी आहे व संस्थेच्या ऐतिहासिक योगदानाचे अत्यंत सविस्तरपणे साक्षेपी दर्शन घडविणारी आहे. ही यशोगाथा गीता प्रेसची आहे तद्वत प्रत्येक सनातनप्रेमी भारतीयांची आहे.
या पुस्तकाची प्रस्तावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आणि विद्यमान अ. भा. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांची आहे. ते असे नमूद करतात-
अत्यंत संपन्न व्यापारी परिवारात देहरूपाने अवतरित झालेले परम श्रद्धेय जयदयालजी गोयंकाचे ‘श्रेष्ठ’ नामकरण झाले, ते श्रद्धेय रामसुखदासजी महाराजांमुळे. पुढे त्या आध्यात्मिक ‘श्रेष्ठ’चे लोकांनी ‘सेठ’ असे संबोधन केले; परंतु आज व्यावहारिक दृष्टीने ‘सेठ’ म्हटल्यावर जी अहंशक्ति उभी राहते ह्याचे अंशमात्रानेसुद्धा दर्शन, ज्यांचा जीवनात होत नाही, ते म्हणजे ‘ब्रह्मलीन जयदयालजी गोयंका’! ही व्यक्ती ‘सेठ’ कल्पनेतील ऐहिक संपन्नतेने परिपूर्ण होती; परंतु ती सर्व संपन्नता समाजरूपी ईश्वरचरणी अर्पण केली होती. त्यांच्या जीवनात ज्ञान, भक्ती व कर्मयोगाचे दर्शन तर घडतेच; परंतु ‘दानयोग’सुद्धा संपूर्ण सामर्थ्यानिशी होता. अशा योग चतुष्ट्याचे दर्शन त्यांच्या जीवनातून घडत होते.
‘प्रेस’ म्हणजे मुद्रणालय, ‘प्रेस’ म्हणजे व्यवसाय, ‘प्रेस’ म्हणजे नफा-तोटा, ‘प्रेस’ म्हणजे साहित्यनिर्मिती ह्या प्रचलित चौकटीमध्ये कोठेही बसत नाही त्याचे नाव ‘गीता प्रेस, गोरखपूर’! म्हणून ह्या प्रकल्पाला ‘यज्ञ’, ‘तपस्या’, ‘साधना’ ह्या स्वरूपातच समजून घेण्याची आवश्यकता आहे. मनोभाव साधकाचा व साधना निर्दोष, शुद्ध असली पाहिजे, असा गीता प्रेस संस्थापकांचा आग्रह होता. ते म्हणत ‘गीतेत चूक करणे म्हणजे चाकूने घाव करण्यासारखे आहे व सुधारणा म्हणजे घावावर मलमपट्टी करण्यासारखे आहे. म्हणून शुद्ध लेखन व बिनचूक अर्थ असलेले साहित्य श्रद्धावंत भाविक वाचकांना उपलब्ध करून देणे हेच आपले कर्तव्य आहे. हीच आमची साधना आहे. म्हणूनच परमश्रद्धेय जयदयालजी गोयंका, हनुमानप्रसाद पोद्दार आणि घनश्यामदास जालान यांसारखी आत्मलोपी सेवाभावी माणसे समाजात दुर्मीळच असतात. अशीच व्यक्तित्वे ‘ईश्वरनिष्ठ’ म्हणून ओळखली जातात.
संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘फोडिले भांडार । धन्याचा तो माल । मी तव हमाल । भारवाही ।।’ (त्वदीय वस्तु गोविंद, तुभ्यम एव समर्पये।) अशी वचने अर्थपूर्ण होतात. ती ‘गीता प्रेस गोरखपूर’ सारख्या प्रकल्पांमुळे! सेवाकार्याच्या मार्गावर वाटचाल करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना गीता प्रेस गोरखपूरचे आत्मलोपी सेवाकार्य दीपस्तंभासारखे आदर्श मार्गदर्शक आहे. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’ हा भाव प्रखरपणे मनात ठेवून व ईश्वरी कृपेवर पूर्ण श्रद्धा ठेवून कार्य प्रारंभ केले तर समाजात आजही मोठी शक्ती आहे जी बरोबर उभी राहून तुमच्या मागे चालू लागते व त्याच साधनेचे वाहक बनत जाते ह्याची प्रचीती येत जाते. म्हणूनच सेठजींबरोबर अनेक सत्संगी या सत्कार्यार्थी पुढे आले, केवळ शुभेच्छा देऊन थांबणारे नाही तर हा धर्मरथ सारथी बनून पुढे नेण्यात सक्रिय सहयोगी झाले.
ह्या धर्मयात्रेचे दुसरे साधक, ‘कल्याण’ मासिकाचे आद्यसंपादक हनुमानप्रसाद पोद्दार ह्या नावाने सर्व जगाला परिचित आहेत. हे ह्या प्रकल्पाचे दुसरे सशक्त आधारस्तंभ ठरले. गीता प्रेसचा इतिहास समजून घ्यायचा म्हणजे श्रद्धेय जयदयाल गोयंका आणि हनुमानप्रसाद पोद्दार (भाईजी) ह्या दोन श्रेष्ठ व्यक्तींना समजून घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या कार्यामध्ये ‘अर्थ’ हे महत्त्वाचे अंग आहे. सेठजींची भूमिका स्पष्ट होती. अशी कार्ये दीर्घकाळ करायची तर दान देणग्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, तर धोरण म्हणून स्वीकारले की गीता प्रेसच्या पुस्तकांची, ग्रंथांची विक्री किंमत अत्यंत अल्प असेल, त्यामुळे खप वाढून आर्थिक व्यवस्था पण सशक्त राहील असे चिंतन केले आणि स्वावलंबी, स्वबळावर विश्वास ठेवून यात्रा प्रारंभ केली. आज शंभरी ओलांडल्यावर त्यात कोणतीही तडजोड झालेली नाही. त्यांची भावना, भांडाराचा मालक ‘गोविंद’ आहे, तोच कर्ता करविता आहे, तोच त्याची चिंता करेल. आम्ही प्रयत्नात शिथिलता येऊ देता कामा नये. ‘चालेल त्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडेल’ ह्या उक्तीनुसार ही साधना अखंड चालू आहे. यात्रेच्या मार्गक्रमणात अनेक गोष्टींचा, योजनांचा अंतर्भाव होत गेला. नवेनवे आयाम जोडले गेले. त्यातूनच ‘गीता प्रेस गोरखपूर’चे आजचे विश्वविख्यात व्यापक स्वरूप उभे राहिलेले आपण बघत आहोत.

संकटकाळात समाजाच्या सेवेचे कार्य हातात घेतले तर कोणी विचारलं की, ‘अशी सेवा किती काळ करायची?’ तर संस्थापक गोयंकाजींचे उत्तर होते, ‘जोपर्यंत आमची स्थितीपण त्यांच्यासारखी होत नाही तोपर्यंत करायचे आहे.’ अशी कामे करताना आपण समाजऋण फेडत आहोत हा भाव असतो तसा. गीता प्रेस गोरखपूरच्या कार्यात ‘ऋणमोचन’ हा भाव प्रकर्षाने बघावयास मिळतो. पितृऋण, समाजऋण, ऋषीऋण व देवऋण विमोचन कार्यातून भक्तीचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला. कालौघात पिढीमागून पिढी येत राहिली व हा पुण्यप्रवाह आजही त्याच भावनेने, गतीने व शुद्धतेने पुढे नेणारी वर्तमान व्यवस्था निश्चितच अभिनंदनीय आहे. गोरखपूरचा गीता प्रेस व परिसर तेवढाच प्रेक्षणीय, दर्शनीय आहे. भारतोत्पन्न विविध पंथ, संप्रदायांचे दर्शन घडेल अशी योजना भव्य प्रवेशद्वार आणि प्रत्येक वास्तूच्या रचनेत शिल्पी समूहाने केली आहे. त्याचबरोबर प्राचीन संस्कृती, कला, प्राचीन मंदिर कला ह्या सर्व गोष्टींचे दर्शन घडवणारा हा परिसर बघितल्यावर त्या संकल्पनेच्या निर्मितीकाराच्या श्रेष्ठत्वाचे दर्शन होत जाते.
कल्याणचे संपादक, सामाजिक कार्यकर्ते, प्रवचनकार श्रद्धेय हनुमानप्रसादजी उपाख्य भाईजींनी आपले सर्व कर्तृत्व ईश्वर चरणी म्हणजे ह्याच ‘गीता प्रेस’ व कल्याण मासिकाच्या कार्यार्थ अर्पण केले होते. प्रदीर्घ ४५ वर्षे संपादक म्हणून त्यांनी ‘कल्याण’ मासिकाचे कार्य केले. भाईजींचे अनेक सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्याशी व श्रेष्ठ व्यक्तित्वांशी आत्मीय संबंध होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी प.पू. श्री गुरुजींमुळे निकटचे संबंध स्थापित झाले होते. १९४८ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघकार्यातसुद्धा अडचणी निर्माण करण्यात आल्या, समाजमनात संभ्रम, द्वेष निर्माण करण्याचे सरकार व विरोधकांकडून प्रयत्नही भरपूर झाले. नंतर परिस्थिती बदलली. संघकार्य पुन्हा नव्या जोमाने प्रारंभ झाले. ठिकठिकाणी प.पू. श्री गुरुजींचे स्वागत-सन्मान कार्यक्रम झाले. गोरखपूरमधील कार्यक्रमात निःसंकोचपणे आपलेपणाने स्वतः भाईजी हनुमानप्रसाद पोद्दार मंचावर उपस्थित होते, असे म्हणतात. त्यांची संघाशी व प.पू. श्री गुरुजींशी असलेली आत्मीयता अधोरेखित करणारी ही घटना आहे.
ज्यावेळी पुणे येथे रा.स्व. संघ, जनकल्याण समितीच्या वतीने ‘गीता प्रेसच्या कार्यास प.पू. श्री गुरुजी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला त्या वेळी गीता प्रेस गोरखपूरच्या परंपरेप्रमाणे अत्यंत विनम्रपणे केवळ पुरस्कार स्वीकारला; परंतु त्यासोबत दिली जाणारी रक्कम न स्वीकारता जनकल्याणच्या कार्यासाठीच त्याचा उपयोग करावा अशी प्रार्थना केली. स्वर्गीय जयदयाल गोयंकाजींच्या शुद्ध कार्याचे दर्शन घडवणारी ही घटना अत्यंत प्रेरक व मार्गदर्शक आहे.
विद्याधरजींच्या लेखणीतून आकाराला आलेली ही ग्रंथरचना वाचकांना त्या भावविश्वात घेऊन जाणारी आहे. ‘गीता प्रेस’च्या ऐतिहासिक योगदानाचे अत्यंत सविस्तरपणे साक्षेपी दर्शन या पुस्तकातून घडते. विद्याधरजींच्या लेखनकार्यात एका नव्या ग्रंथाची भर पडत आहे. यापूर्वीची ‘देवर्षी नारद’, ‘शिवोपासना’, ‘संतसाहित्यातील रामदर्शन’, ‘संतकवी श्रीधर’, ‘संत जनाबाईंचे विचारविश्व’ ही त्यांची पुस्तके पुरस्कारप्राप्त व वाचकप्रिय आहेतच. प्रस्तुत ‘यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची’ या पुस्तकानेही वाचक वर्ग लाभान्वित होईलच व प्रकाशकसुद्धा आपल्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानाचा अनुभव घेतील. ग्रंथलेखक विद्याधरजी ताठे व प्रकाशक परम मित्र पब्लिकेशन्स, ठाणे ह्या उभयतांचे मनःपूर्वक अभिनंदन, भविष्यात अशी निर्मिती आपल्या हातून होत राहावी ह्यासाठी ईश्वर कृपा प्राप्त होत राहील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
या पुस्तकास मी प्रस्तावना लिहावी, अशी ठाणे येथे गेल्या महिन्यातच झालेल्या एका प्रकाशन समारंभात माधव जोशी यांनी विनंती केली होती आणि त्यांच्या अकाली आकस्मिक निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मृत्योर्मा अमृतगमय! त्यांचे कार्य पुढे नेटाने चालवणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली आहे.
या आकर्षक छपाई केलेल्या पुस्तकात आठ विभाग असून ते पुढीलप्रमाणे- १) गीतेच्या महाद्वारी, २) गीता प्रेस गोरखपूरची जन्मकथा, ३) ‘कल्याण’ मासिकाचा सूर्योदय, ४) कल्याण कल्पतरू इंग्रजी मासिक, ५) संस्थापक सत्संगी जयदयालजी गोयंका (शेठजी), ६) सेवामूर्ती घनश्यामदासजी जालान, ७) ‘कल्याण’ आदिसंपादक हनुमानप्रसाद पोद्दार, ८) समारोप.
आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे.
पुस्तकः यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची
लेखक: विद्याधर ताठे
प्रकाशक: परम मित्र पब्लिकेशन
मूल्य: ४००/- रुपये

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)