टोक्यो ऑलिंपिकमधील भारताची पहिली पदक विजेती सैखोम मीराबाई चानू आणि तिचे प्रशिक्षक विजय शर्मा काल संध्याकाळी स्वदेशी परतले. भारतात त्यांचे भव्य, जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांच्या घरी आयोजित विशेष सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रीजीजू, केंद्रीय ईशान्य भारत क्षेत्र विकास मंत्री किशन रेड्डी, केंद्रीय नौवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसीथ प्रामाणिक यावेळी आवर्जून उपस्थित होते.

भारोत्तोलनात महिलांसाठीच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलेल्या मीराबाई चानूने सामर्थ्य आणि मनाची तयारी यासाठीचे प्रशिक्षक एरॉन होर्शिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यासाठी 1 मे रोजी अमेरिकेला प्रयाण केले होते. कोविड-19मुळे भारतातून येणाऱ्या लोकांवर अमेरिकेत प्रवासासाठीचे निर्बंध लागू होण्याच्या काही दिवसांपूर्वी अत्यंत कमी काळात सरकारने चानूला अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाण्यास सहाय्य केले.

सरकारने दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे. त्याशिवाय पदकापर्यंतचा माझा प्रवास शक्य नव्हता. माझे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. याच क्षणासाठी मी कित्येक वर्षे प्रशिक्षण घेत होते आणि सर्वांसाठीच भव्य असणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा मंचावर माझे स्वप्न साकार झाल्याचा मला अतिशय आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया हर्षभरित चानूने यावेळी व्यक्त केली.
गेल्यावर्षी माझ्या खांद्याशी संबंधित दुखापतीवर उपचारासाठी केलेला अमेरिकेचा दौरा पदकांसाठीच्या माझ्या प्रवासात महत्त्वपूर्ण ठरला. टारगेट ऑलिंपिक पोडियम योजनेने (TOPS) माझे करियर तसेच पदकांविषयीच्या अपेक्षा उंचावल्या, असेही चानू म्हणाली.

खेळाडूंच्या नवीन पिढीला हा विजय प्रेरणा देत राहील
मीराबाई चानूचे यश, टोक्यो ऑलिम्पिकच्या पदक सोहळ्यात भारताचा झेंडा फडकावला गेला आणि भारताचे राष्ट्रगीत वाजू लागले तेव्हा १३० कोटी भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला, असे उद्गार अनुराग ठाकूर यांनी काढले.
पदक आणण्याचा शब्द तिने पाळला
किरण रिजिजू यांनी सांगितले की, टोक्योला जाण्यापूर्वी झालेल्या आमच्या संभाषणात तिने देशासाठी पदक आणण्याचे वचन दिले होते आणि तो शब्द तिने पाळला. तिने भारताला मिळवून दिलेला गौरव आणि मान तिच्या वर्षांनुवर्षाच्या चिकाटीचे, समर्पणाचे आणि कठोर मेहनतीचे फळ आहे. तिच्यावर जो प्रशंसेचा वर्षाव होत आहे त्यावर तिचा पुरेपूर अधिकार आहे.

