Homeकल्चर +वीरमाता अनुराधा गोरे...

वीरमाता अनुराधा गोरे यांचे ‘अशक्य ते शक्य’ प्रकाशित!

हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना आपले हृदय किती घट्ट करावे लागते हे आपण प्रत्यक्ष पाहिले आहे. देशाचे शूरवीर जवान व अधिकारी यांचे शौर्य तसेच वीरमाता व हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या धैर्य व त्यागामुळेच देश सुरक्षित आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केले.

कारगिल विजय दिनाच्या २२व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित ‘अशक्य ते शक्य.. कारगिल संघर्ष’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना राज्यपाल म्हणाले की, भारताला शांती हवी असली तरीही शत्रूराष्ट्रांनी देशाला वेढले आहे, ही वस्तुस्थिती विसरता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली आज देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून देशाच्या सुदूर सीमावर्ती भागात चांगले रस्ते व सुसज्ज हवाईतळ उभारण्यात आले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

सन १९६२ साली आपण विद्यार्थी दशेत असल्यापासून आजपर्यंत देशाचे अनेक जवान व अधिकारी हुतात्मा झालेले आपण पहिले आहे. खुद्द आपल्या २२ वर्षीय बहिणीचे पती १९६२च्या युद्धात शहिद झाले होते, अशी आठवणही राज्यपालांनी सांगितली.

कारगिल युद्धात भारताची रणनीतीही जिंकली आणि कूटनीतीही जिंकली. डोकलाम व गलवान याठिकाणी चीनने नव्या भारताचे सामर्थ्यवान रूप पाहिले असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितले. ‘अशक्य ते शक्य’ हे पुस्तक केवळ युद्धकथा नाही तर तो कारगिल युद्धाकडे पाहणारा समग्र ग्रंथ आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते महावीर चक्रविजेते हवालदार दिगेन्द्र सिंह, हवालदार दीप चंद, घातक पलटणचे हवालदार मधुसूदन सुर्वे, हवालदार पांडुरंग आंब्रे व हवालदार दत्ता चव्हाण, स्क्वाड्रन लीडर राहुल दुबे, कॅप्टन रुपेश कोहली, कॅप्टन विद्या रत्नपारखी, सविता दोंदे, कर्नल सुशांत गोखले यांच्या आई रोहिणी आनंद गोखले व कर्नल संदीप लोलेकर यांच्या भगिनी कोमल शहाणे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

लेखिका अनुराधा गोरे यांनी ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा व भूमिका स्पष्ट केली. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे दिनकर गांगल व सुदेश हिंगलासपुरकर यांचा यावेळी राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी कारगिल युद्धविषयक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

कार्यक्रमाला आमदार मंगल प्रभात लोढा, लोढा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंजू लोढा, अनुराधा गोरे व मुंबई प्रभागाचे प्रमुख एअर व्हाईस मार्शल एस आर सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. व्हॉइस ऑफ मुंबई व लोढा फाउंडेशन यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हर्शल कंसारा यांनी सूत्रसंचालन केले.

Continue reading

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...
Skip to content