Homeचिट चॅटभारताचा विक्टरी पंच...

भारताचा विक्टरी पंच जगाला दिसू दे!

ऑलिम्पिकमध्ये जय-पराजयाला फारसे महत्त्व नाही, तर तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचे आहे   आणि यंदा मोठ्या संख्येने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूच्या संख्येने ते सिद्ध झाले आहे असे सांगत भारताचा विक्टरी पंच जगाला दाखवण्याची  ही सर्वोत्तम संधी असल्याचे टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण म्हणाले . 

टोक्यो ऑलिम्पिकचे बिगूल वाजले आहे. आज होणाऱ्या उद्घाटनापासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात होत आहे. यानिमित्ताने पत्र सूचना कार्यालय आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या वतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुंपुढील आव्हाने आणि संधी’ या वेबिनारचे आयोजन केले होते. टोक्योमध्ये वार्तांकनासाठी गेलेले  क्रीडा  पत्रकार संदीप चव्हाण, न्यूज डंका पोर्टलचे सहायक संपादक महेश विचारे आणि मुक्त पत्रकार शैलेश पाटील यांनी वेबिनारमध्ये सध्याची कोरोना परिस्थिती आणि भारतीय क्रीडापटूंना पदक जिंकण्याची असलेली संधी आदी विषयावर भाष्य केले.

 टोक्योमध्ये खेळाडूंच्या आरोग्याची अतिशय योग्य काळजी घेतली जात आहे. यासाठी खेळाडूंचेही पूर्ण सहकार्य मिळत आहे. कोरोना काळात एकत्र येत एकमेकांना धीर देण्याची शिकवणूक खेळाडूंनी जोपासली आहे असे तिथल्या प्रत्यक्ष स्थितीविषयी संदीप चव्हाण यांनी सांगितले. अतिशय आव्हानात्मक काळात स्पर्धा होत असल्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीकडे पूर्वीच्या निकषांप्रमाणे पाहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत होत असलेले हे ऑलिम्पिक मानवी जिद्दीचा विजय आहे. पदक कोणाच्याही नावे असले तरी कोरोना काळात सरकारने खेळाडूंना दिलेला पाठिंबा, त्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचे प्रतिबिंब नक्कीच दिसून येईल, असा आशावादही चव्हाण यांनी व्यक्त केला.

भारतीय खेळाडूंना सरकारी पातळीवर आर्थिक सहाय्य, भारतीय क्रीडा प्राधीकरण (SAI), बेंगळुरु येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांनीयुक्त स्पोर्ट अकादमी जिथे खेळाडूंना  चांगला सराव करता आला. त्याचे परिणाम या ऑलिम्पिकमध्ये नक्कीच दिसून येतील, असे मुक्त पत्रकार शैलेश पाटील म्हणाले. कोरोना काळातही खेळाडूंच्या सरावात व्यत्यय येऊ नये, यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले. खेळाडूंच्या लसीकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला, याचा नक्कीच खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी उपयोग झाला. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंशी साधलेला संवाद आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विमानतळावर येऊन क्रीडापटूंना दिलेल्या शुभेच्छा या खेळाडूंच्या मानसिकतेसाठी फार महत्त्वाच्या होत्या असेही त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्राचा वाढलेला टक्का ही महाराष्ट्रीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे न्यूज डंका पोर्टलचे सहाय्यक संपादक महेश विचारे म्हणाले. अतिशय बिकट परिस्थितीतून ऑलिम्पिकपर्यंत भरारी घेतलेला अमरावतीचा प्रवीण जाधव (तिरंदाजी) आणि बीडचा अविनाश साबळे (स्टीपल चेस) यांच्या कामगिरीवर जगाचे लक्ष असणार आहे. तसेच राही सरनोबत आणि तेजस्विनी सावंत (नेमबाजी), विष्णू सर्वानन (सेलिंग), चिराग शेट्टी (बॅडमिंटन) या महाराष्ट्रीय खेळाडूंकडूनही पदकाची अपेक्षा आहेत आणि ते तो सार्थ ठरवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पत्र सूचना कार्यालय, मुंबई येथील सोनल तुपे यांनी वेबिनारच्या संवादकची भूमिका बजावली. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांची निर्मिती असलेल्या ऑलिम्पिक स्फूर्तीगीताने या वेबिनारची सांगता झाली. 

Continue reading

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस...

समाजमाध्यमांवरच्या 11 हजार संदेशांविरूद्ध निवडणूक आयोगाची कारवाई

देशातली पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका तसेच काही ठिकाणी होत असलेल्या पोटनिवडणुका यासंदर्भात 15 मार्च 2026 रोजी घोषणा झाल्यापासून आतापर्यंत 11 हजारांपेक्षा अधिक समाजमाध्यम संदेश, यूआरएल शोधण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आशय काढून टाकणे, प्रथम माहिती अहवाल नोंदविणे, स्पष्टीकरणे आणि खंडन यांचा समावेश आहे. केंद्रीय...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...
Skip to content