Skip to content
Sunday, January 12, 2025
Homeडेली पल्सशिवसेना नेमणार विभागवार...

शिवसेना नेमणार विभागवार शिवदूत!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून येत्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्षमपणे तयारीला लागा. 19 जून, या वर्धापनदिनापासून पक्षाची सदस्यनोंदणी पुन्हा सुरू करणे, आपापल्या विभागात मतदारांची नोंदणी करून मतदारयाद्या दुरुस्त करणे तसेच विभागवार शिवदूतांच्या नेमणुका करणे याला प्राधान्य देण्याचे आवाहन शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

19 जूनला होणाऱ्या शिवसेनेच्या 58व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले राखले असून आता पूर्ण ताकदीने विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश दिले.

या लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट उबाठा सेनेपेक्षा उत्तम होता. त्यांनी 22 जागा लढवून 9 जिंकल्या तर आपण 15 जागा लढवून 7 जिंकल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट 42 टक्के तर आपला 48 टक्के एवढा आहे. दुसरीकडे मुंबईत त्यांच्यापेक्षा 2 लाख जास्त मते आपल्याला मिळालेली आहेत. बाळासाहेबांचे छत्रपती संभाजीनगर आपण राखले असून कोकणातही जनतेने महायुतीलाच साथ दिलेली आहे. त्यामुळे जनता आपल्याला साथ देत आहे. असे असले तरीही महायुतीबद्दल या निवडणुकीत निर्माण झालेले चुकीचे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीत पालटून टाकण्यासाठी आपल्याला अधिक जोमाने काम करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ‘संविधान बदलणार’ असे खोटे नरेटिव्ह तयार करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील आपले सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे सरकार आहे. त्यामुळे आशा चुकीच्या नरेटिव्हची आगामी विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. पंढरपूरच्या आषाढी वारीसहित, दहीहंडी, गणपती, दसरा, दिवाळी असे सर्व हिंदूंचे सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे करावेत. वारीला निघणाऱ्या पालख्यांचे पक्षाच्या वतीने जागोजागी स्वागत करावे तसेच त्यांची सोय करावी असेही आदेश शिंदे यांनी दिले.

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील तापमान प्रचंड वाढले होते. राज्यातील काही भागातील तापमान 50 ते 52 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात शासनाकडून वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख वृक्ष लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मात्र त्यासोबत अशीच मोहीम पक्षाच्या वतीने राबवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढाकार घेऊन कामाला लागावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

Continue reading

आता माजी सैनिकांना मिळतेय व्यावसायिक शेतीचे प्रशिक्षण! 

संरक्षण मंत्रालयाच्या रिसेटलमेंट झोनने (दक्षिण कमांड) अलीकडेच लष्कर, नौदल आणि हवाई दलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स (जेसीओ) आणि निवृत्त अधिकाऱ्यांसाठी (आरओ) म्हणजेच माजी सैनिकांना नवोन्मेष आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापनावरील रिसेटलमेंट अभ्यासक्रम नुकताच सुरू केला आहे. 23 डिसेंबर 2024ला सुरू झालेला...

21 ते 29 जानेवारीदरम्यान राष्ट्रपती भवनात ‘नो एन्ट्री’!

प्रजासत्ताकदिनाचे संचलन आणि बीटिंग रिट्रीट या सोहळ्यामुळे येत्या 21 ते 29 जानेवारीदरम्यान राजधानी दिल्लीत राष्ट्रपती भवन (सर्किट-1) बंद राहणार असून सर्वसामान्य नागरिकांना तेथे भेट देता येणार नाही. त्याचप्रमाणे उद्या, 11 जानेवारी तसेच 18 आणि 25 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाचा सराव...

नागपूरमध्ये उद्यापासून ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा’!

नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा' उद्यापासून 19 जानेवारीदरम्यान आयोजित केला जाणार आहे. या दहादिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्यं, हस्तशिल्पप्रदर्शन त्याचप्रमाणे व्यंजनांची...