Homeटॉप स्टोरीस्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचे लोक...

स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचे लोक कुठे लपले होते?

काँग्रेसची लढाई भाजपा, नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून मनुवादी विचारधारेच्या विरोधात आहे. देशाचे संविधान व लोकशाही कायम राखण्यासाठी आहे. आम्हाला हिटलर बनायचे नाही. देशात सर्व धर्माचे लोक एकत्र राहावेत हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवले आहे. काँग्रेस देशासाठी लढला. देशासाठी काँग्रेसचे लोक फासावर चढले. नरेंद्र मोदींच्या भाजपाचे लोक स्वातंत्र्य चळवळीत कुठे होते? स्वातंत्र्यांच्या लढाईत आरएसएसचे लोक कुठे लपून बसले होते, असे सवाल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी काल केले.

नागपूरचे काँग्रेस, इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या प्रचारसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बोलत होते. भाजपा धर्माच्या नावावर मते मागत आहे. काँग्रेसला राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण दिले. पण ते आले नाहीत असा खोटा प्रचार नरेंद्र मोदी करत आहेत. प्राणप्रतिष्ठेचे काम साधूसंतांचे आहे. पण हे नवीनच साधू निघाले आहेत. दलित समाजाला आजही मंदिरात प्रवेश मिळत नाही तर मी एकटा मंदिरात कसे जाऊ? नवीन संसदेच्या पायाभरणीला तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बोलावले नाही. नवीन संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलावले नाही. राम मंदिराच्या उद्घाटनालाही बोलावले नाही. ते राष्ट्रपती असूनही मागासवर्गीय असल्याने भाजपा व मोदींनी त्यांना न बोलावून दलित समाजाचा अपमान केला. हा अपमान आधी बंद करा, असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान भाजपानेच कायम ठेवले असे नरेंद्र मोदी सांगत आहेत, ते साफ खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी, पंडित नेहरु यांनी संविधान बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवली व ते संविधान आजपर्यत काँग्रेसने टिकवून ठेवले आहे. आरएसएसच्या कार्यालयात बाबासाहेबांचा फोटोही लावत नाहीत व कालपर्यंत देशाचा तिरंगा झेंडाही आरएसएसच्या कार्यालयावर फडकवला नाही, असेही खरगे यांनी सांगितले.

भाजपाचे सरकार आले तर दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. १० वर्षांतील २० कोटी नोकऱ्या कुठे गेल्या हे आता गडकरी व मोदींना विचारा. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देतो असे ते म्हणाले. पण हे पैसेही मिळाले नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही. भ्रष्टाचाऱ्यांना जवळ करु नका असे म्हणणाऱ्या मोदींनीच २३ भ्रष्ट नेत्यांना भाजपात घेतले. विरोधी पक्षात होते तोपर्यंत भ्रष्टाचारी आणि भाजपात आले की पवित्र झाले का? असा सवाल खर्गे यांनी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनाम्यात ५ न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. ३० लाख सरकारी नोकऱ्या, गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवणार, कामगारांचे अधिकार व हक्क कायम करणार, सामाजिक सुरक्षा देणार. शेतमालाला एमएसपीचा कायदा, पीकविम्याचे पैसे ३० दिवसात देणार. जीएसटीमुक्त शेती करण्याची गॅरंटी काँग्रेसने दिलेली आहे. काँग्रेसची गॅरंटी वॉरंटीसहित आहे, मोदी गँरंटीसारखी खोटी नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार चंद्रकांत हंडोरे, विलास मुत्तेमवार, आशिष दुआ, सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, वजाहत मिर्झा, अभिजित वंजारी, नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, बंटी शेळके, अतुल कोटेचा, गिरिश पांडव, प्रकाश गजभिये आदी हाविकास आघाडीचे नेते  उपस्थित होते.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content