यावेळच्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचाऱ्यांकडे असेल. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ मतदान केंद्रे दिव्यांग कर्मचारी नियंत्रित असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अशा ६ जिल्ह्यांत प्रत्येकी एका मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग करणार आहे. गडचिरोली, सिंधुदूर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.

या वर्षी मतदारयादीमध्ये एकूण ६,०४,१४५ दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्क पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप
केंद्रीय निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीतजास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

