वंचित बहुजन आघाडीला राज्याच्या महाविकास आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसने स्वतःच्या कोट्यातल्या दोन जागा सोडण्याची तयारी दाखवली असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेही त्यांच्या कोट्यातल्या प्रत्येकी दोन जागा सोडाव्यात, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचे कळते. शरद प वार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला हवेच आहेत, अशी भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीही त्यांच्या कोट्यातल्या दोन जागा वंचितसाठी सोडण्याच्या तयारीत असल्याचे कळते. मात्र ठाकरे गटाची तशी तयारी अजून झालेली दिसत नाही. त्यामुळेच वंचित आघाडी महाविकास आघाडीत सहभागी करायची की नाही याचा निर्णय आज प्रकाश आंबेडकर घेणार असल्याचे समजते.
दोन दिवसांपूर्वीच आंबेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाबरोबर केलेली युती तोडल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटाचे नेते संजय राऊत वारंवार खोटे बोलत असल्याचा आरोप करत आहेत. राऊत यांनी वंचितला चार जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याचे म्हटले होते तर आंबेडकर यांनी प्रत्यक्षात तीन जागाच महाविकास आघाडीने देऊ केल्याचे स्पष्ट केले होते. लोकसभेच्या मागच्या निवडणुकीत वंचितने एमआयएमबरोबर आघाडी केली होती. त्याचा फार मोठा फटका महाविकास आघाडीला बसला होता. हा अनुभव लक्षात घेता काँग्रेसने वंचितला सोबत घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे बोलले जाते.

काल नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी या पुढाकाराची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मित्रपक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत. या जागांवर काँग्रेसकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, असेही ते म्हणाले.

देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठी आहे. भाजपाचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव करेल. मागील १० वर्षांत भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले. त्याचा उगम हा नागपूरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे आहे, असे ते म्हणाले.
नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचे नाही. ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला. मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला. पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. आज जनतेला गांधींच्या विचाराची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली नागपूरला बेहाल करुन ठेवले आहेत. नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतूक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले? नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत. आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. काँग्रेसमध्ये एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार २.५ लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

