Friday, October 18, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजडेनिस फ्रान्सिस यांनी...

डेनिस फ्रान्सिस यांनी लुटला वडापाव, जिलेबीचा मनसोक्त आनंद!

भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत काल झालेल्या चर्चेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण विकास सुरू आहे तोदेखील चकित करणारा आहे असे ते म्हणाले. या बैठकीसाठी चहापानाबरोबर खास मुंबईचा वडा पाव आणि जिलेबी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना या पदार्थांच्या लोकप्रियतेविषयी सांगितले व आग्रह केला. संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर प्रतिनिधी यांनी या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि याविषयीही जाणून घेतले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमवेत वर्षा या शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्र अधिकारी व प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत काल दुपारी एक बैठक झाली. या बैठकीस संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंभोज, स्टीव्हन फिलिप, कैशा मॅकग्वेरे, स्नेहा दुबे, स्टीव्हन फिलिप, शॉम्बी शार्प, हम्मा मरियम खान उपस्थित होते. राज्य शासनातर्फे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, परराष्ट्र मंत्रालयाचे राजेश गावंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे बैठकीत सहभागी झाले होते.

यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या त्रिनिदाद आणि टोबैगो देशाच्या भारताशी पूर्वापार असलेल्या संबंधाला उजळणी दिली. ते म्हणाले की, त्रिनिदाद असेंब्लीमध्ये असलेले सभापतींचे आसन हे भारताने भेट म्हणून दिलेले असून या आसनाच्या साक्षीने अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत.

डेनिस फ्रान्सिस

मुंबईत चैतन्य

मी भूगोलाचा विद्यार्थी असून भारत हा माझ्या अभ्यासाचा विषय होता असे सांगून डेनिस फ्रान्सिस यांनी भारतात मुंबईचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, मुंबईत चित्रपटसृष्टी आहे आणि मीदेखील काही चित्रपट पहिले आहेत. मात्र यावेळी मुंबईत ज्या प्रमाणात गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत ते चकित करण्यासारखे आहे. महाराष्ट्र हे देशातले एक मोठे औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे मुंबईचे एक वेगळे महत्त्व आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित असताना विशेषत: तरुण मुले, मुली, लहान मुलं यांच्यामध्ये असलेली देशप्रेमाची झलक आणि त्यांच्यातले चैतन्य पाहून मी प्रभावित झालो. आज शांतता आणि सुरक्षेचे जगात महत्त्व असून सध्याच्या अस्थिर अशा जागतिक वातावरणात भारताची भूमिका मोठी आणि निर्णायक आहे. मी महासभेचा अध्यक्ष म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांत विश्वास वाढीस लागावा आणि विविध प्रश्नांवर तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतोय, त्यात महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा भारतासारखा देश मला महत्त्वाचा  वाटतो, असेही ते म्हणाले.

प्रदूषणावर मात, महिला सक्षमीकरण – मुख्यमंत्री

प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या दृष्टीने प्राधान्याचा असलेला हवामान बदलाचा विषय महाराष्ट्रातदेखील महत्त्वाचा आहे. आमचे शासन पर्यावरणपूरक विकासावर भर देणारे असून शाश्वत विकास हेच ध्येय आहे. प्लास्टिकवर बंदी, बांबू लागवड, ग्रीन हायड्रोजन धोरण तसेच मुंबईत सुरू असलेली डीप क्लिनिंग मोहीम अशी पाउले टाकून आम्ही पर्यावरण संरक्षण करीत आहोत. महिलांच्या बचत गटांना अधिक सक्षम करीत आहोत तसेच लेक लाडकीसारख्या योजनेतून मुलींचे कल्याण करण्यात येत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.            

प्रारंभी राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.

Continue reading

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...

20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान! 23ला निकाल!!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असून त्याचकरीता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केले जातील. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या...
Skip to content