देशभरात लाकूड, बांबू आणि इतर वनोपजांची विनाअडथळा वाहतूक सुलभ करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय मालवाहतूक परवाना प्रणालीचा (एनटीपीएस) प्रारंभ केला.
सध्या, राज्यांच्या विशेष मालवाहतूक नियमांच्या आधारे लाकूड आणि वन उत्पादनांच्या वाहतुकीसाठी मालवाहतूक परवाने दिले जातात. “एक राष्ट्र-एक पास” व्यवस्था अशी एनटीपीएसची संकल्पना आहे. त्यामुळे देशभरात विनाअडथळा मालवाहतूक शक्य होईल. व्यवसाय सुलभतेसाठी हा उपक्रम देशभरातील कृषी वनीकरणामध्ये सहभागी असलेल्या वृक्ष उत्पादकांना आणि शेतकऱ्यांसाठी एकात्मिक ऑनलाईन पद्धत वापरून लाकूड मालवाहतूक परवानग्या जारी करणे सुलभ करेल.

यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एनटीपीएस वापरण्याची व्यवहार्यता आणि सुलभता दाखवण्यासाठी, वनोपजांची वाहतूक करणाऱ्या देशभरातील भारतीय वाहनांना भूपेंद्र यादव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. गुजरात आणि जम्मू आणि काश्मीरमधून पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसाठी लाकूड आणि इतर वनोपज घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

एनटीपीएसच्या देशव्यापी अंमलबजावणीसह ही ऐतिहासिक कामगिरी आहे, असे भूपेंद्र यादव यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यांनतर सांगितले. एनटीपीएसमुळे भारताच्या विकासाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची हमी दिलेल्या अधिक पारदर्शकतेच्या दिशेने प्रवास बळकट करण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.

एनटीपीएस हे कृषी वनीकरण आणि जंगलाबाहेरील झाडांसाठी परिवर्तनकारी ठरेल यावर, पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी भर दिला.

वापरकर्त्यांच्या सोयीच्या दृष्टीने एनटीपीएसची रचना करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुलभ नोंदणी आणि परवाना अर्जांसाठी डेस्कटॉप आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स आहेत. एनटीपीएससाठी https://ntps.nic.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

