Homeटॉप स्टोरीतब्बल २२ वर्षांनंतर...

तब्बल २२ वर्षांनंतर शरद पवार यांना स्वबळाचे वेध?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर गेल्या २२ वर्षांत बहुतांश काळात सतत कोणाचा ना कोणाचा हात धरून सत्तेची फळे चाखणाऱ्या शरद पवार यांना आता स्वबळावर सत्तेत येण्याचे वेध लागले असल्याचे कळते.

प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबरोबर शरद पवार यांनी तब्बल तीन तास चर्चा केली. आज सकाळी साडेदहा वाजता प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी भेट घेतली. तेथे या दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यानंतर या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी अशी चर्चा विविध राजकीय नेते करत आहेत.

कालच पवार यांनी १९९९ साली स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त केलेल्या संबोधनात त्यांनी पुढच्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढविण्याचा इरादा जाहीर केला होता. या मनोदयाला २४ तासही उलटत नाहीत तोच प्रशांत किशोर यांच्याबरोबर त्यांनी सुमारे तीन तास चर्चा केली.

गेल्या काही महिन्यांपासून केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीला सक्षम विरोधी पक्ष म्हणून विविध राजकीय पक्षांची मोट बांधण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. तशा मिटिंगाही त्यांनी काही वेळा घेतल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) तोंड देण्यासाठी संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) मजबूत करण्याकरीता त्याचे नेतृत्त्व पवार यांच्याकडे सोपविण्याचे आवाहन केले होते. सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी युपीएच्या अध्यक्षा आहेत.

शरद पवार

राऊत यांच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी घवघवीत यश मिळवल्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांचा मोदीविरोधी एकमेव चेहरा असेल असा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्याबरोबर पवार यांनी केलेली चर्चा महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसविण्याच्या अनुषंगाने असावी, असा कयास बांधला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार सुप्रिया सुळे यांचे राजकीय बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत. याच प्रक्रियेत ते आपला नातू रोहित पवार यांच्या राजकीय अस्तित्त्वाला बळकटी आणत आहेत. अजित पवार यांना हळूहळू बाजूला सारणे हाही त्यांचा एक अजेंडा आहे. मागच्या काळात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा जास्त होती. त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद सहज येत होते. परंतु तसे न करता त्यांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे सोपविले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. अजितदादांना शह देण्याचाच हा प्रयत्न होता, असे बोलले जाते. प्रशांत किशोर व पवार, या दोघांच्या चर्चेला यादृष्टीनेही पाहिले जात आहे.

प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केले. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशपातळीवर विरोधी पक्षाचा चेहरा कोण असणार? पुढील काळात राष्ट्रवादीची रणनीती आणि राजकीय कार्यक्रमाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यताही बोलली जात आहे.

प्रशांत किशोर यांची आयपॅक नावाची कंपनी विविध राज्यांमधल्या विधानसभा निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकीतील डावपेच आखण्याचे काम करते. २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांचे रणनीतीकार म्हणून त्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंह, बिहारमध्ये नितीश कुमार, मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठीही त्यांनी काम केले होते. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे राजकीय डावपेच त्यांनीच आखले होते. मात्र, ममता यांच्या विजयानंतर त्यांनी या कामातून निवृत्ती जाहीर केली होती. या ‘निवृत्ती’च्या काळातच प्रशांत किशोर यांनी आज पवार यांची भेट घेतली आहे.

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content