भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला केंद्रातल्या सत्तेतून हुसकावून लावण्याकरीता तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय तिसरी बैठक उद्यापासून मुंबईत सुरू होत असून यामध्ये आघाडीचा संयोजक निवडला जाण्याची शक्यता आहे. याच बैठकीत घाडीचा किमान समान कार्यक्रमही तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे समजते.
आज यानिमित्ताने राज्यातल्या महाविकास घाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदी नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. देशातली कायदा-सुव्यवस्था तसेच महागाईच्या मुद्द्यावर यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी भर दिला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरू केलेली नाही. पहिल्या दोन बैठका झाल्या, त्या महत्त्वाच्या होत्या. उद्याच्या बैठकीत इथून पुढे सामूहिक कार्यक्रम काय असावा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. असा निर्णय झाला तर काही लोकांवर ही जबाबदारी द्यावी लागेल. अन्य राजकीय घटकपक्षांशी संवाद साधून यातून आपण एकत्र पुढे जाऊ शकतो का यासंदर्भातील अभ्यास करण्याबाबत काही लोकांवर जबाबदारी सोपवावी लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार, जागावाटप कसे होणार, संयोजक कोण असणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. इंडिया आघाडीला अद्यापही संयोजक ठरवता आला नाही, ते पंतप्रधान काय ठरवणार अशी टीका भाजपाकडून सातत्याने केली जात आहे. यावर प्रश्न विचारल्यावर शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीच्या संयोजकासाठी आम्ही किमान समान कार्यक्रम करू शकतो. या आधारे संयोजक ठरवू.
शरद पवार बोलत असतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांसाठी आमच्याकडे खूप पर्याय आहेत. पण भाजपाकडे काय पर्याय आहे? गेल्या १० वर्षांत त्यांनी काय केलं? सगळ्यांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. कर्नाटकात पाहिले, कोणतेच यश मिळाले नाही. बजरंग बलीनेही त्यांना आशीर्वाद दिला नाही. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने २०० रुपयांनी गॅस सिलिंडरचा दर कमी केला. ‘इंडिया’ जसजसा पुढे जाईल, तसा एक दिवस असा येईल, की केंद्र सरकार मोफत गॅस सिलिंडर देईल. आज झालेल्या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, अशोक चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

