बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलावक्षेत्रात जुलै २०२३मध्ये चांगली पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे जलसाठ्यामध्ये समाधानकारक वाढ झाली आहे. हीच परिस्थिती ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२३मध्ये कायम राहिल, असा अंदाज आहे. हे लक्षात घेता मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात लागू केलेली १० टक्के पाणीकपात उद्यापासून बुधवार, दिनांक ९ ऑगस्टपासून रद्द करण्यात येणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यामध्ये प्रारंभी मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत पालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलै २०२३पासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरइतका असावा लागतो. सद्यस्थितीत तलावक्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पाणीसाठा ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. असे असले तरी, ऑगस्ट व सप्टेंबर २०२३मध्ये काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास, त्याप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. तलावक्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

