राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा बुधवारी सुरू झाला. सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला सर्वपक्षीय संमतीने सुट्टी घेण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील दोन शक्तीशाली नेत्यांमधील विळ्याभोपळ्याचे सख्य सभागृहातही अनुभवायला मिळाले. ते एकमेकांसमोर आहेत तेच बरे आहे, असे जणू विधानसभा अध्यक्षांनाच सुचवायचे होते…
आदिवासींना वनजमिनींवरील वनहक्काच्या संदर्भातील प्रश्नाला महसूलमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे-पाटील उत्तर देत होते. त्यावेळी युपीए सरकारने ऐतिहासिक निर्णय घेऊन आदिवासी बांधवांना जमिनीवरील हक्क दिले, पण त्यांचे नाव सातबाराच्या उताऱ्यावर इतर हक्कांमध्ये लावले जाते. त्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न विचारल्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपणही ऐतिहासिक निर्णय लवकरच घेऊ, असे सांगून थोरात यांची बोळवण केली आणि सभागृहात हास्याची लकेर उठली.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विखे-पाटील यांना उद्देशून सूचना केली की, मंत्रीमहोदय ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न कायमचा सोडवतील का… विखे आणि थोरात यांच्यातील विळ्याभोपळ्याचे नाते सर्वांनाच माहीत असल्याने अशोक चव्हाण यांच्या टिप्पणीवर सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. पण मंत्र्यांनी काही उत्तर द्यायच्या आधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, हे दोघे एकत्र येऊन नवे प्रश्न निर्माण होणार नाहीत ना… त्यावर सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ उडाला.

तुम्हाला बाबा का म्हणतात, याचा पुरावा मागणार का….
संभाजी भिडे गुरुजी यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यांवरून विधानसभेत बुधवारी गदारोळ माजला. त्यावेळी माजी मंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा माणूस स्वतःला फर्ग्युसन महाविद्यालयाचा प्रोफेसर म्हणवून घेतो आणि बहुजन समाजाकडून सोने गोळा करतो. त्याचे गुरुजी म्हणून महिमामंडन का केले जात आहे? त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले की, संभाजी भिडेगुरुजी असेच त्यांचे नाव आहे. जसे तुमचे नाव पृथ्वीराजबाबा आहे, तर तुम्हाला बाबा का म्हणतात, याचा पुरावा मागणार का….
आमदार जयंत पाटील यांनी विचारले की, मनोहर कुलकर्णी किंवा मनोहर भिडे महात्मा गांधींचा अपमान करतात. त्यांना पुढे गाडी, मागे गाडी असे सरकारचे संरक्षण का दिले आहे? त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले की, जयंतरावांची माहिती चुकीची आहे. त्यांना कोणतेही संरक्षण दिलेले नाही. जेव्हा मिरवणूक असते तेव्हा सर्वांप्रमाणे पोलीस बंदोबस्त असतो. सांगलीत फक्त एक पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी दिलेला आहे.

